जळगाव (प्रतिनिधी) शेळगाव येथील धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना दि. १८ नोव्हेंबर रोजी घडली. दोन दिवसानंतर त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळून आल्यानंतर त्यांची ओळख पटली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील शेळगाव येथे रमेश कोळी हे पत्नी व मुलासह वास्तव्याला होते. शेतमजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होते. शनिवारी दि. १८ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता रमेश कोळी हे धरणाजवळ असलेल्या अन्नपूर्णा माता मंदीरात दर्शनासाठी गेले होते. धरणाच्या नदीपात्रात ते हातपाय धुण्यासाठी गेले असता त्यांचा तोल जावून पाण्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. पहाटेपासून गेलेले रमेश कोळी दुपार उशिरापर्यंत देखील घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु त्यांच्याबद्दल काहीही माहिती मिळून येत नव्हती आणि त्यांचा शोध लागत नव्हता.
दोन दिवसानंतर सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शेळगाव येथील हेमंत कोळी, भगवान कोळी आणि सुभाष कोळी हे शेळगाव धरणात पोहण्यासाठी गेले होते. त्यांना धरणात बुडलेल्या रमेश कोळी यांचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना दिसून आला. ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करुन मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला, या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौदार हरीष पाटील करीत आहे.