जळगाव प्रतिनिधी – सोशल मीडियावर फक्त टीका टिपणी न करता सोशल मीडियाचा सकारात्मक उपयोग कसा होऊ शकतो याचे ज्वलंत उदाहरण डॉ. नितु पाटील यांनी त्यांच्या फेसबुकच्या पोस्टद्वारे जनसामान्यांसमोर मांडले आहे. जे फक्त सोशल मीडियावर दिवसभर फक्त गळड ओकत असतात, त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा वास्तववादी लेख.…!
मी दि. 17 जून 2025 माझ्या मित्राच्या मुलाच्या नावामागे त्याच स्वतः चे नाव लागण्यासाठी काही तात्काळ उपाययोजना मिळावी,माहिती मिळावी यासाठी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. सदर पोस्ट वाचुन मला शिरसोली येथील श्री. राजूजी बारी यांचा फोन आला.त्यांनी मला माझ्या पोस्टला जोडून दुसरी एक उपकथा सांगितली. त्यानुसार,
सन 2000 मध्ये दोन ते अडीच वर्षाचा एक मुलगा मा.आ.श्री एकनाथराव खडसे यांच्या फार्म हाऊस जवळ बेवारस अवस्थेत श्री. विजय तुकाराम झोपे यांना दिसून आला. त्याच्या आई-वडिलांविषयी विचारपूस केली असता, शोधाशोध केली असता लक्षात आले की आई-वडिलांनी त्याचा त्याग केला असावा. त्याला नाव विचारले असता त्याने ‘दादू’हे नाव सांगितले.
दादू हा 2000 पासून कोथळी गावात राहत असल्याने पुढे त्याचे नाव “दादू कोथळीकर’असे करण्यात आले.त्यावेळी गावातील विजय तुकाराम झोपे, अजय तुकाराम झोपे, दीपक मनोहर कोळी,नितीन प्रल्हाद चौधरी ,सुभाष पाटील ( माजी पोलीस पाटील )यांची त्याला मदत झाली.अनाथ असल्याने मुक्ताईनगर मधील आश्रम शाळेत तो राहू लागला आणि अनौपचारिक पणे माणुसकीच्या नात्याने आश्रम शाळा प्रशासनाने दादूला पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेण्यास मदत केली. पण कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी ऍडमिशन झाली नाही कारण शालेय भरतीसाठी त्याकडे कुठलाही दाखला नव्हता.त्याच्या जन्माबाबत ग्रामपंचायत कार्यालय कोथळी आणि पोलीस स्टेशन मुक्ताईनगर इथे चौकशी केली असता कुठलीही नोंद दिसून आली नाही. ही बाब लक्षात घेत त्याने पोलीस पाटील संजय दिनकर चौधरी यांच्या सहाय्याने कोर्टामध्ये अर्ज करून मला/दादू योग्य ती जन्मतारीख मिळावी म्हणून अर्ज केला .संपूर्ण तपासाअंती प्रथम न्यायदंडाधिकारी मुक्ताईनगर यांनी दादू कोथळीकर यांची जन्म तारीख 14/04/2002 अशी करण्यात यावी, असे आदेश दिले.त्यानुसार त्याला जन्म दाखला आणि आधार कार्ड तयार करण्यात आले. दरम्यान त्याचे लग्न देखील झाले.
आता दादूला पुढील शिक्षण घेण्याची मनापासून इच्छा होती,पण कुठलाच शालेय दाखला नसल्याने अडचण निर्माण होत होती. तेव्हा ती अडचण मी दूर करावी असे राजू भाऊ बारी यांनी मला सांगितले.
मी दादूशी संपर्क केला सर्व असलेले कागदपत्रे मागवली,त्यावर अभ्यास करत मी पत्र तयार केले. त्यानुसार मा. जिल्हाधिकारी,मा. शिक्षणधिकारी,मा.बाल व महिला विकास अधिकारी आणि मा. समाजकल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क आणि पत्रव्यवहार केला.त्यानुसार मा.कल्पनाजी चव्हाण मॅडम,माध्यमिक शिक्षणाधिकारी स्वतः हा वरणगावला आल्यावर माझी भेट घेत सर्व चर्चा झाली.
सर्वांचं हेच म्हणणे होत,ही अशी पहिली घटना आहे.दादूचा कुठलाच शालेय दाखला नाही.पहिली,दुसरी काहीच नाही.त्याची भरती कशी होणार, कोणत्या वर्गात होणार.…(RTE अंतर्गत वय 16 पर्यंत इयत्ता 8 मध्ये भरती होता येते, दादू चे वय 23 कसं होईल?कोण जबाबदारी घेईल? शिवाय शालेय कागद पत्र नाही?)
तेव्हा 2 पर्याय,
1. शिक्षण मंत्री,मंत्रालय संपर्क
2.जनहित याचिका
मी मा.श्री. महेंद्रजी पवार ,पी.एस शिक्षणमंत्री यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांनी लगेच नाशिक बोर्ड संबंधित अधिकारी मा. अनिलजी देसले यांच्याशी संबंधित चर्चा केली. मला फोन आल्यावर मी सर्व माहिती देत मी श्री.सी. जी. तायडे मुख्याध्यापक, महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव यांच्याशी बोलणे करून दिले.
आज दि.27 जून ला दादू कोथळीकरचा विद्यालय क्लार्क मा. श्री.भास्कर अप्पा यांच्या मदतीने मी स्वतः हा ऍडमिशन फॉर्म मध्ये सर्व माहिती आणि पालक म्हणूनच सही करत इयत्ता 8वी.मध्ये दादूला प्रवेश मिळाला असून शैक्षणिक मुख्य प्रवाहात सामील करत दादूच्या शिक्षणाचा मार्ग उघडला…!
(खरं पाहता मी वयानुसार इयत्ता 10 वी साठी आग्रही होतो,पण RTE नुसार फक्त 8वी पर्यंत शालेय भरती होते,मला वाटतं असे जे अनेक दादू असतील तर लोकप्रतिनिधी यांनी विधानसभेत RTE चा परीघ वाढवण्यासाठी शिक्षण तज्ञ मंडळी सोबत सल्लामसलत करून एखादं नवीन कायदा करण्यात यावा)
संपूर्ण जळगाव जिल्ह्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ही अशी एक शालेय भरती असेल,ज्यात कुठलाही शालेय दाखला नाही,आहे ती फक्त प्रशासकीय सेवेचा शिक्षणा संबंधीचा त्वरित सकारात्मक प्रतिसाद,फक्त 10 दिवसांत निकाल आपल्या समोर आहे.
या कामी मला भरपुर प्रशासकीय अधिकारी वर्गाची मोलाची मदत झाली.यात,
मा. आयुष प्रसादजी,जिल्ह्याधिकारी,जळगाव
मा. योगेशजी पाटील,सहआयुक्त समाज कल्याण,
मा. कल्पनाजी चव्हाण मॅडम,शिक्षणाधिकारी,
मा.महेंद्रजी पवार,शिक्षण मंत्रालय,
मा. अनिलजी देसले,नाशिक बोर्ड
मा. हरीशजी भांबरे, नाशिक
मा. रोहिदासजी दोरकुळकर,नाशिक
मा. धनंजय खेवलकर,विधी सल्लागार,जळगाव
मा. पवन पाटील,जळगाव,
मा. योगेश मुक्कावार, औरंगाबाद,
मा. भागवत पाटील सर,वरणगाव आदी आदी या सर्वाच्या मदतीने हे शक्य झाले. सर्वांचे मी दादुच्या वतीने सविनय आभार व्यक्त करतो…!
डॉ. नितु पाटील,
वासुदेव नेत्रालय,वरणगाव