भुसावळ (प्रतिनिधी) शहीद कोरोना योद्ध्यांच्या वारसांना लवकरात लवकर विमा कवचचा लाभ मिळावा म्हणून प्रत्येक जिल्हास्तरावर एक विमा प्रतिनिधी नेमावा”अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी केली होती, त्यानुसार आता प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांनाच सदर जबाबदारी दिली आहे, असे आदेश आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी काढले आहे.
केंद्रसरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत आणि राज्य शासनाने जाहीर केलेल्या सर्व प्रमाणित कोरोना योध्यासाठी, कोरोना कार्यकाळात कोरोना रुग्णांची सेवा करत असतांना कोरोना संक्रमित झाल्यावर उपचारांती मयत झाल्यास त्यांच्या वारसांना रु. ५० लाख देण्याचे जाहीर केले होते. जे जे कोरोना योध्या मागील पहिल्या लाटेमध्ये आपले कर्तव्य बजावतांना मयत झाले त्यांचे अजूनही एक वर्ष होत आले तरी प्रस्ताव मंजूर नाहीत, प्रलंबित आहेत.
सर्व कोरोना विमा कवच हे दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड याच्याद्वारे सेटल/पास होत असून मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसांना लवकरात लवकर विमा कवचाचा लाभ मिळावा, त्यांचा मानसिक त्रास कमी व्हावा, तसेच सर्वांचा वेळ आणि पैसे वाचावे म्हणून सदर कंपनीद्वारे “प्रत्येक जिल्हास्तरावर एक विमा प्रतिनिधी नेमावा” जो हेच कार्य पार पाडेल आणि काही अपूर्णता असल्यास लगेच पूर्तता करण्यात येईल. त्यानंतरच सदर प्रकरण पुढील कारवाईसाठी पुढे पाठवावे. यामुळे वेळ, शाररीक श्रम, आणि पैसा तर वाचेलच पण मयत कुटुंबियांना पण मानसिक दिलासा मिळेल. अशा आशयाची जनहित याचिका उच्च न्यायालय औरंगाबाद याठिकाणी ३० एप्रिल २०२१ ला पत्राद्वारे आणि ई-मेल द्वारे दाखल करावी म्हणून पत्रव्यवहार केला होता. उच्च न्यायालय औरंगाबाद यांच्या उत्तर पत्रानुसार (दि. २० मे २०२१) डॉ. नि. तु. पाटील यांनी सदर मागणी पुणे आणि नागपूर येथील दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड ऑफिस आणि इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट औथोरिटी (आयआरडीए) चे मुंबई येथील कार्यालयात पत्रव्यवहार करत ई-मेल पण संपर्क साधला आणि माहिती दिली.
सदर बाब आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांच्या लक्षात आल्याने त्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना ही जबाबदारी दिली आहे. (२८ मे २०२१). आता प्रत्येक विमा कवच प्रस्तावाला योग्य ती कागदपत्रे जोडणे, प्रलंबित प्रस्ताव पूर्ण करणे, काही प्रमाणित सर्टिफिकेट जोडणे आदी कार्य करून तसे सर्टिफिकेट जिल्हाधिकारी यांना जोडावे लागणार आहे. सदर परिपूर्ण प्रस्ताव दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडे आल्यावर, फेरतपासणी अंती ४८ तासात शहीद कोरोना योद्ध्यांच्या वारसांना विमा कवचचा लाभ मिळणार आहे.
शहीद कोरोना योद्ध्यांच्या वारसांना लवकरात लवकर विमा कवचचा लाभ मिळावा त्यासाठी परिवाराची होणारी ससेहोलपट डॉ. नितु पाटील यांच्या लक्षात आल्याने त्यावर त्यांनी सुयोग्य पाठपुरावा केल्याने आता विमा कवच प्रस्ताव तातडीने मंजूर होणार. याबद्दल डॉ. नि. तु. पाटील त्यांच्या सकारात्मक प्रयत्नशील कार्याची शहरात चर्चा आहे.