नागपूर (वृत्तसंस्था) भूतबाधा दूर करून आईवडिलांच्या भटकत असलेल्या आत्म्याच्या शांतीसाठी तीन बोगस मांत्रिकांनी एका महिलेला १२ लाख ८ हजार ५०० रुपयांनी गंडविले. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १ जानेवारी २०१९ ते २४ नोव्हेंबर २०२३ दरम्यान घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. ईश्वर उर्फ इंद्र पप्पू शर्मा व साहिल चिरंजीलाल भार्गव, अशी आरोपींची नावे आहेत.
महिलेचा विश्वास केला संपादन !
हुडकेश्वर हद्दीत राहणाऱ्या ३८ वर्षीय महिलेचे पतीसोबत पटत नव्हते. त्यामुळे वर्ष २०१८ पासून तिचे समुपदेशन केंद्रात कौन्सिलिंग सुरू आहे. दरम्यान, महिलेच्या ओळखीच्या एका व्यक्तीने त्यांची आरोपी ईश्वर उर्फ इंद्र पप्पू शर्मा (३५), सुनील पप्पू शर्मा (३८, दोन्ही रा. ओमकारनगर चौक, अजनी) तसेच साहिल चिरंजीलाल भार्गव (१९, रा. भगवाननगर) यांच्यासोबत भेट करून दिली. आरोपी हे भूतबाधा काढण्याचे काम करीत असल्याचे या व्यक्तीने महिलेला सांगितले. यानंतर महिलेने तिच्या घरात सुरू असलेल्या प्रकरणाबाबत माहिती देत उपाययोजनेसंदर्भात विचारणा केली. यावेळी आरोपींनी आम्ही सगळे पाहून घेऊ, असे म्हणत महिलेचा विश्वास संपादन केला.
सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लुबाडली !
आरोपींनी त्यांची भूतबाधा काढण्याच्या कामाला सुरुवात केली आणि महिलेकडून २० हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांनी घरातच भूतबाधा असल्याचे त्यांना सांगितले. याकरिता त्यांनी महिलेकडून वेळोवेळी पैसे घेतले. वर्ष २०२१ मध्ये महिलेच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी महिलेला तुमच्या आई व वडिलांच्या मृत्यूमुळे शांती करावी लागेल, त्यांची आत्मा भटकत आहे, असे सांगत त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेतली. आरोपींनी संगनमत करून महिलेच्या घरात भूतबाधा निर्माण झाली, असे सांगत ती दूर करण्याकरिता तसेच त्यांच्या आईवडिलांच्या आत्म्यांच्या शांतीकरिता वेळोवेळी पैसे व दागिने, ६ लाख ५३ हजार ५०० रुपयांची रोकड व ५ लाख ५५ हजार रुपयांचे दागिने, असा एकूण १२ लाख ८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल घेत त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भादवी कलम ४२०, ३४, सहकलम ३ (२), नरबळी आणि इतर अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध कायदा २०१३ नुसार गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली.