पंढरपूर (वृत्तसंस्था) देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहे. सर्वाधिक मृत्यूही महाराष्ट्रात आहे. परंतु, ही परिस्थिती हाताळण्यास ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळेच लॉकडाऊन केला जातोय. कष्टकरी, शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज न देता लॉकडाऊन केला जात आहे. पॅकेजशिवाय करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनला आमचा विरोध आहे, असं सांगतानाच राज्यात लोकशाही नसून लॉकशाही आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान औताडे यांचा प्रचार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आले होते. यावेळी प्रचारसभेतून जनतेशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधारी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून सभा घेण्याची सवय गेली आहे. दुर्देवाने ही पोटनिवडणूक लागली आहे. एका मतदारसंघाची ही पोटनिवडणूक असली तरी सरकारचा नाकर्तेपणा दाखवून देण्याची ही संधी मतदारांना मिळाली आहे, असं सांगतानाच देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहे. सर्वाधिक मृत्यूही महाराष्ट्रात आहे. परंतु, ही परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळेच लॉकडाऊन केला जात आहे. कष्टकरी, शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज न देता लॉकडाऊन केला जात आहे. पॅकेजशिवाय करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनला आमचा विरोध आहे, असं सांगतानाच राज्यात लोकशाही नसून लॉकशाही आहे, असं फडणवीस म्हणाले.
या सरकारने वीज कापणार नाही असं आश्वासन अधिवेशनाच्या सुरुवातीला दिलं. अधिवेशन सुरू झाल्यानंतर या सरकारने लगेचच वीज तोडणी सुरू केली. एखाद्या गावात पाच लोकांनी वीज बिल भरलं नाही तर त्या गावचा ट्रान्सफार्मर काढला जात असून गावांना अंधारात लोटलं जात आहे. त्यामुळे आज पंढरपूरच्या विकासाचं आश्वासन देणाऱ्या या सरकारला भुलून जाऊ नका. ठाकरे सरकार केवळ लबाड सरकारच नाही तर महावसुली सरकार आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.