मुंबई (वृत्तसंस्था) आमदारांचं निलंबन हा किचकट आणि जिकरीचा विषय आहे. १७ आमदारांच्या निलंबनाबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतील, असं राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील बंडखोर १७ आमदारांवर निलंबनाच्या कारवाईची मागणी शिवसेनेने विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केलीय. यावर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसे माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले, मी विधान भवनात आमदार झाल्याचं प्रमाण पत्र घेण्यासाठी आलो होतो. १७ आमदारांच्या निलंबनाबाबत विधानसभा उपाध्यक्ष अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतील.आमदारांच निलंबन हा किचकट आणि जिकिरीचा विषय आहे. ज्या लोकांनी सह्या केल्यात,त्यांचं व्हेरिफिकेशन करावं लागेल. नारायण राणे यांच्यावेळी सर्व आमदारांना विधानभवनात बोलवून व्हेरिफिकेशन करण्यात आले. त्यांच्याकडून एफेडेविट करून घेतलं होतं. भाजपने आजच स्पष्ट केलंय की आमचा शिंदेंच्या बंडात सहभाग नाही, त्यावर विश्वास ठेवायला हवा.
शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करुन त्यांच्यासोबत शिवसेनेच ४० आणि अपक्ष दहा आमदार असल्याचा दावा नुकताच केला आहे. शिंदे गटाकडून बंडाचे निशाण फडकवल्याने शिवसेनेत मोठी खिंडार पडली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून शिंदे गट आणि शिवसेना यांच्या राजकीय संघर्ष सुरु असून महाविकास आघाडी सरकारलाही याचा मोठा फटका बसला आहे.