मुंबई (वृत्तसंस्था) ओमायक्रॉन या नव्या कोरोनाच्या व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून, जर आपण काळजी घेतली नाही तर ओमायक्रॉनच्या रूपात तिसरी लाट येऊ शकते असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
जगासह देशावर कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे पुन्हा एकदा चिंतेत वाढ झाली आहे. कोरोनाच्या या व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावरुन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “नागरिकांनी योग्य खबरदारी घेतली नाही, तर राज्यात कोरोनाची तिसरी लाट ही ओमायक्रॉनमुळे येऊ शकते, अशी भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. पण घाबरण्याचं कारण नाही. नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन करावे. तसेच लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावं, असं आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे. परदेशातून येणाऱ्यांसाठी पाच सूत्री एक्शन प्लॅन महापालिकेनं तयार केला आहे. धोकादायक देशांमधून येणाऱ्यांवर बारीक नजर ठेवली जाणार आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल यांनी हा एक्शन प्लॅन तयार केला आहे.