धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावात चोर आणि पोलिसांच्या पाठलागचा थरार रंगल्याची खळबळजनक घटना रविवारी मध्यरात्री घडली. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे धरणगावात चोरीचा फसला आहे. दरम्यान, पोलिसांनी पाठलाग करूनही अंधाराचा फायदा घेत पाच चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले आहेत. (Thief-Police-Chase-Thriller-In-Dharangaon)
या संदर्भात अधिक असे की, रविवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास नेहमी पोलिसांचे वाहन गस्तीवर होते. याच वेळी पोलिसांना फोन आला की, चिंतामण मोरया परिसरातील एका बंद घरात चोरटे शिरले आहेत. गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या वाहनात हवालदार संजय सूर्यवंशी व पोलिस नाईक समाधान भागवत हे दोघं जण होते. या दोघं कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता चिंतामण मोरया परिसरात धाव घेतली.
चिंतामणी मोरया नगरात मंदिराच्या बाजूलाच शिक्षक मनोज गुजर यांच्या चोरटे शिरले होते. परंतू पोलीस आल्याची चाहूल लागताच दोन चोरांनी कंपाउंडमधून उड्या मारून पळ काढला. हवालदार संजय सूर्यवंशी व पोलिस नाईक समाधान भागवत यांनी चोरट्यांच्या दिशेने धाव घेताच घराच्या मागच्या बाजूने आणखी तीन चोरटे देखील पळून गेलेत.
पोलिसांनी शिट्या वाजवल्या, अनेकांना आवाज दिला. परंतू मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे घराबाहेर कुणीही आले नाही. तरी दोघं पोलीस कर्मचाऱ्यांनी चोरट्यांच्या दिशेने पाठलाग सुरु केला. रेल्वे स्टेशनकडील कपाशीच्या शेतात दूरपर्यंत चोरांचा पाठलाग केला. परंतू ते पळून जाण्यात यशस्वी झालेत. उर्वरित तीन चोरेटे शहराच्या दिशेने पळून गेलेत. धरणगाव पोलिसांनी दाखवलेल्या धाडसामुळे चोरीचा प्रयत्न असफल झाला. दरम्यान, दोघं पोलीस कर्मचाऱ्यांचे गावात कौतुक होत आहे. पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी देखील दोघं कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.