चाळीसगाव (प्रतिनिधी) महापुराच्या संकटातून सावरणाऱ्या चाळीसगाव शहरावर पुन्हा नद्या कोपल्या आहेत. मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे कजगाव येथील तितूर नदीला आठ दिवसांत दुसऱ्यांदा महापूर आला. यावेळी नागरिक सावध झाले होते, म्हणून नदीकाठावरील जनावरे सुरक्षितस्थळी हलविण्यात आली होती.
चाळीसगाव तालुका परिसरात आठ दिवसांच्या अंतरात दुसऱ्यांदा जोरदार पावसाने झोड़पल्याने महापुराचा सामना करावा लागत आहे. सकाळी चार वाजेच्या सुमारास तितुर नदीच्या पाण्याची पातळी वाढली. यावेळी देखील नदीपात्रातील पाणी गावात शिरल्याने जूनेगाव ते नवेगावातील मुख्य रस्ता बंद होऊन नागरीकांचा संपर्क तुटला होता. जवळपास पाच ते सात तास वाहतूक ठप्प झाली होती. भोरटेक, खाजोळा, पिप्री, वडगाव या गावांचा पुन्हा संपर्क तुटला आहे. या भागातील शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना मार्ग देखील बंद झाला आहे. दरम्यान ट्रान्सफॉर्मर पाण्याखाली आल्यामुळे सकाळपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे.