सिल्लोड (वृत्तसंस्था) अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने गळा आवळून खून करत मृतदेह अजिंठा घाटात फेकून पुरावा ही घटना सिल्लोड शहरात ४ जून रोजी घडली. तब्बल ४० दिवसांनंतर कुजलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना सापडला. राजू बाबूलाल महेर (३२, रा. पळशी) असे मृत पतीचे नाव आहे. याप्रकरणी गणेश महेताब मेहेर (रा. पळशी), गजानन कोंडीचा भोंबे (रा. आडगाव, ता. भोकरदन, जि. जालना), करण नारायण बारवाल (रा आडगाव, ता. भोकरदन, ह.मु. सिल्लोड) रेणुकाबाई राजू मेहेर (३०, रा. पळशी, ता. सिल्लोड ) यांच्याविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेणुका व आरोपी गणेशचे अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध होते. त्याची माहिती रेणुकाचा पती राजूला समजली होती. त्यामुळे तो रेणुकावर संशय घेऊन तिला सतत मारहाण करत होता. आपल्या संबंधात राजू हा अडचणीचा ठरू लागल्याने ही बाब रेणुकाने गणेशला सांगितली. दोघांनी राजूला नेहमीसाठीच संपविण्याचा निश्चय केला. यासाठी राजूला ४ जून रोजी कामानिमित्त सिल्लोडला बोलावून घेत याठिकाणी मनसोक्त दारू पाजली. मद्यधुंद अवस्थेत राजूला घेऊन गजानन शिक्षक कॉलनीत बंद असलेल्या घराजवळ गेले. या ठिकाणी अंधारात गणेशने राजूचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह गोणीत टाकून तो वाहनाद्वारे अजिंठा घाटात फेकला. ही घटना ४ जून रोजी रात्री घडली होती.
कुणाला संशय येऊ नये म्हणून रेणुकाने १५ जून रोजी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात पती बेपत्ता असल्याची तक्रार दिली. सुरुवातीला सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी मिसिंग दाखल करून तपास सुरू केला. निरीक्षक सीताराम म्हेत्रे, नाईक सचिन सोनार, के. डी. दारकुंडे, भाग्यवंत, रवि भारती, वैजिनाथ चव्हाण, भय्यासाहेब तडवी, यतीन कुलकर्णी यांनी पळशी येथे जाऊन आरोपींना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच गणेशने खुनाची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी अजिंठा घाटात जाऊन राजूचा मृतदेह शोधल्यानंतर तो पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी मयताच्या नातेवाईकांना बोलावून जागेवरच शवविच्छेदन करून व शवविच्छेदन करत नातेवाईकांच्या स्वाधीन केले.