हरदोई (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील माधोगंज भागातील एका महिलेचे एका तरुणाने नाक कापले. यानंतर या महिलेने आपल्यावर बेतलेल्या भयंकर प्रसंगानंतर आत्महत्या केलीये. पण आत्महत्येपूर्वी पीडित महिलेने फेसबुकवर मार्मिक पोस्ट लिहित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे. माधोगंज पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.
मृत महिलेचा पती मनोज याने सांगितलं की, एक लवी नावाचा तरुण तिला त्रास देत होता. लवीच्या कृत्यामुळे त्रस्त होऊन आम्ही ते घर सोडून दुसऱ्या भागात भाडे तत्वावर घर घेतलं होतं. ते पत्नी आणि मुलासह येथेच राहत होते. सांगितलं जात आहे की, शनिवारी ते घरातून दुकानात जाण्यासाठी निघाले होते. त्या दरम्यान लवी त्यांच्या घरी शिरला आणि ५० हजारांची कॅश आणि मोबाइल घेतला. याचा जेव्हा रोलीने विरोध केला तर लवीने रोलीला गुप्ताला पोलिस स्टेशनला बोलावलं. रोली आपल्या तीन मुलांसह स्टेशनवर जात होती. तेव्हा रस्त्यात बसलेल्या लवीने रोली गुप्ताला मारहाण सुरू केली. लवीने रोली गुप्ताचं नाक कापलं. ज्यानंतर ती बेशुद्ध झाली. याबाबत पतीला कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पतीने पोलिसांना सर्व घटना सांगितली. मात्र पोलिसांनी तक्रार लिहून घेतली नसल्याचं मृत महिलेच्या पतीने सांगितलं.
पोलिसांनी तक्रार लिहून घेतली नसल्याने न्यायासाठी रोलीने मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये तिने न्यायाची मागणी केली. यानंतर तिने फेसबुकवर सर्व घटनाक्रम सांगितला. यानंतर रोलीने घरात स्वत:च्या साडीने गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.