
जळगाव (प्रतिनिधी) – पर्यटनासाठी गेलेल्या न्यायालयातील रजिस्ट्रार रविंद्र श्रीराम ठाकूर (रा. मयुर कॉलनी, अनुगणू पार्क पिंप्राळा) यांच्या घराचा चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. दरम्यान, घरातील गोदरेजचे कपाट तोडून चोरट्यांनी ८७ हजार ३३० रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरुन नेले. ही घटना दि. २८ जून ते दि. १ जुलै दरम्यान घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शिवकॉलनी परिसरात अॅड. शैलेश श्रीराम ठाकूर (वय ४५) हे वास्तव्यास असून त्यांचा मोठा भाऊ रविंद्र ठाकूर हे मयुर कॉलनीतील अनुगणु पार्क येथे राहतात तर न्यायालयात रजिट्रार या पदावर कार्यरत आहे. ते दि. ८ जून रोजी दुपारच्या सुमारास परिवारासह बाहेरगावी पर्यटनासाठी गेला आहे. त्यांच्या घराशेजारी मनोहर वाणू हे वास्तव्यास असून त्यांच्याकडे रविंद्र ठाकूर यांच्या वॉलकंपाऊंटमधील झाडांना पाणी देण्यासाठी चावी दिलेली आहे. तसेच दि. २८ जून रोजी शैलेश ठाकूर हे त्यांच्या भावाच्या घराची साफसफाई करुन गेले होते.
शेजारच्यांनी दिली घरफोडी झाल्याची माहिती
बुधवार दि. १ जुलै रोजी सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास मनोहर वाणी यांनी शैलेश ठाकूर यांना फोन केला. त्यांनी तुमच्या भावाच्या घराच्या वॉलकंपाऊंट व दाराचे कुलूप दिसत नाही, तुम्ही आले आहात का असे विचारले. त्यावर ठाकूर यांनी मी दोन दिवसांपासून तेथे आलोच नसल्याचे सांगत ते लागलीच भावाच्या घरी पोहचले.
गोदरेजच्या कपाटातून रोकडसह दागिने लंपास
भावाच्या घरी गेल्यानंतर त्यांना मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी घरात जावून पाहणी केली असता, त्यांना बेडरुममधील गोदरेजच्या कपाटाचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यामध्ये ठेवलेली ३० हजार रुपयांच्या रोकडसह ८७ हजार ३३० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने चोरुन नेल्याचे दिसून आले. घरफोडीची खात्री झाल्यानंतर अॅड. शैलेश ठाकूर यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक सचिन रणशेवरे हे करीत आहे.
















