पुणे (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक केल्यानंतर भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे. आता यासर्व प्रकरणावरच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवारांनी भाजपला आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा दाखला दिला आहे.
‘नवाब मलिक यांच्यावर चुकीच्या पद्धतीने व राजकीय हेतूने कारवाई केली गेली आहे. त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना यातना देण्याचा प्रयत्न जाणूनबुजून केला जातोय. मात्र, याविरोधात आम्ही संघर्ष करत राहणार, असं पवार म्हणाले. नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची भाजपची मागणीही त्यांनी ठाम शब्दांत फेटाळून लावली. ‘गेली २० वर्षे महाराष्ट्राच्या विधानसभेत नवाब मलिक आहेत. त्या सर्व काळात कधी असं चित्र दिसलं नाही, आताच का दिसलं?, असा सवालही त्यांनी केला. ‘एखादा मुस्लिम कार्यकर्ता दिसला की त्याला दाऊदचा जोडीदार ठरवायचं हे नवीन नाही. मलिक यांच्यावर विनाकारण हा आरोप केला जातोय. कधीकाळी माझ्यावरही असे आरोप झाले होते. हे लोक या पद्धतीनं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात. त्याची चिंता करण्याचं कारण नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
‘नवाब मलिक यांना अटक झाली म्हणून मंत्रिमंडळातून काढा असं बोलताय. त्यांना अटक झाली हे मान्य, पण सिंधुदुर्गातील एक जुने सहकारी नारायण राणे यांनाही अटक झाली होती. त्यांना अटक झाल्यानंतर मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय कुणी घेतल्याचं माझ्या पाहण्यात किंवा वाचनात आलं नाही. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत आहेत. उद्या कदाचित त्याचा खुलासा करतील, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. ‘एक न्याय नारायण राणे यांना लावता आणि दुसरा न्याय नवाब मलिक यांना लावता याचा अर्थ हे सगळं राजकीय हेतूने केलं जातंय, असं शरद पवार म्हणाले.