जळगाव (प्रतिनिधी) निवडणूक आयोगाने महानगरपालिकेला पाठवलेल्या पत्राचे वाचन बुधवारी दुपारी मनपा आयुक्त तथा प्रशासक ज्ञानेश्वर ढेरे यांच्या दालनात आयोजित बैठकीत, नगरसचिव सुनिल गोराणे यांनी केले. तसेच यावेळी मनपाच्या आस्थापना विभागाच्या उपायुक्त निर्मला गायकवाड, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक अमोल पाटील यांची देखील उपस्थिती होती. सदर पत्राचे वाचन करतांना त्यामध्ये प्रभाग रचनेत कोणतेही बदल करण्याबाबत नमुद करण्यात आलेले नाही, तसेच सदस्य संख्येत बदलबाबत देखील काही निर्देश नसल्यामुळे तुर्त मनपाच्या प्रभाग रचनेसह सदस्य संख्येत कोणताही बदल करण्यात येणार नाही, मात्र, शासनाच्या पुढील मार्गदर्शक सूचना येतील त्यानुसार बदल केले जाणार असल्याची चर्चा यावेळी झाली.
सुप्रिम कोर्टाने चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले आहेत. त्या अनुषंगाने महापालिका, नगरपरिषद व नगर पंचायतींच्या प्रभाग रचना करण्यासंदर्भात राज्याचे प्रधान सचिव डॉ. के एच. गोविंदराज यांनी महानगरपालिकेला पत्र दिले आहे. या पत्राचे वाचन मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या समक्ष नगरसचिव सुनिल गोराणे यांनी केले. तसेच उपायुक्त निर्मला गायकवाड, सहाय्यक संचालक अमोल पाटील यांनी देखील यावेळी चर्चा केली.
कालमर्यादा निश्चित नाही; मार्गदर्शक सूचनांची आवश्यकता
या पत्रामध्ये प्रभागाची लोकसंख्या आणि मर्यादचे पालन करणे, गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे, प्रभाग रचना करण्याची मार्गदर्शक तत्वे, प्रभागांची सरासरी लोकसंख्या, प्रभागांची संख्या, सदस्य संख्या लगतच्या जनगणनेच्या (२०११) लोकसंख्येच्या आधारे उपलब्ध करून द्यावी, असे आदेशित केले आहे. मात्र, या पत्रात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही, त्यामुळे कोणत्या कामासाठी किती कालमर्यादा आहे, याविषयी उल्लेख नसल्यामुळे पुढील मार्गदर्शक सूचना आल्यानंतर पुढील कार्यवाही करता येईल, अशी चर्चा अधिकाऱ्यांमध्ये झाली. लगतच्या जनगणने नुसार (२०११) प्रभाग रचना व सदस्य संख्या ठेवण्यात यावी, असे निर्देश पत्रात असल्यामुळे तुर्त प्रभाग रचना व सदस्य संख्येत कोणताही बदल होणार नाही, असे दिसून येत आहे. मात्र, शासनाच्या नवीन काही गाईडलाईन आल्यास त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
कामाच्या जबाबदारीचे केले वितरण
निवणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शासनाला निर्देश दिले असून शासनाकडून महापालिकेला व जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र देवून कोणी कोणती जबाबदारी पार पाडावी यासंदभाँत सूचना केल्या आहेत. मनपा आयुक्तांनी प्रारूप प्रभाग रचना तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावी, जिल्हाधिकाऱ्यांनी प्रारूप प्रभाग रचना सादर करणे, मनपा आयुक्तांनी प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द करणे, जिल्हाधिकारी यांनी प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी घेणे, जिल्हाधिकारी यांनी सुनावणीच्या अहवालासह अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणुक आयुक्त यांच्या मान्यतेसाठी सादर करणे, निवडणूक आयुक्तांनी सुनावणी नंतर प्राप्त अहवालानुसार अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणे, मनपा आयुक्तांनी अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करणे असे टप्पे पाडले असले तरी, त्यांच्यासाठी कालावधी निश्चित केलेला नाही, त्यामुळे प्रशासन देखील काही अंशी संभ्रमात आहे.
गुगल मॅपद्वारे होणार प्रभाग रचनेची मांडणी
महापालिकेला गुगल मॅपद्वारे प्रभाग रचनेची मांडणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात नमुद करण्यात आले की, गुगल अर्थचा नकाशा, या नकाशावर प्रगणक गटांच्या सीमा हिरव्या रंगाने दर्शवाव्यात, प्रगणक गटांचे क्रमांक व त्या प्रगणक गटांची लोकसंख्या दर्शवावी, प्रत्येक प्रगणक गटाच्या बहुभूजास त्या प्रगणक गटांचा क्रमांक एकून लोकसंख्या, अनुसूचित जातीची लोकसंख्या आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या लेजेंडमध्ये भरावी, प्रभागांच्या सीमा निळ्या रंगाने दर्शवाव्यात, नकाशावर शहरातील महत्वाची ठिकाणे, रस्ते, नद्या नाले, रेल्वे लाईन आदी स्पष्टपणे दर्शविण्यात यावे, नवीन निवडणूक प्रभागांच्या हद्दी लाल रंगाने दर्शविण्यात यावे, प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र नकाशा तयार करावा, असेही पत्रात नमुद करण्यात आले आहे.
समिती होणार गठीत
प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव तयार करण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रांची संपूर्ण माहिती असलेला अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, नगर रचनाकार, संगणक तज्ञ व आवश्यकतेनुसार इतर अधिकारी यांची निवड करून समिती गठीत करण्यात येणार आहे.