नवी दिल्ली (वृत्तसंस्था) संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते असू शकतात. शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. युपीएवर बोलायला युपीएमध्ये आसावेच लागते असे काही नाही. युपीए हा राष्ट्रीय विषय आहे, असे राऊत यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या टीकेवर उत्तर दिले आहे.
राष्ट्रीय स्तरावर एका मजबूत विरोधी आघाडीची स्थापना होणे गरजेचे आहे. हे ज्या राज्यस्तरीय नेत्यांना कळत नाही त्यांनी कृपा करून बोलू नये. या विषयावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी बोलले तर ठीक, ते देखील यावर चिंतन करत आहेत, असे प्रत्यूत्तर संजय राऊत यांनी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना दिले आहे. कधीकधी लूज बॉलला कॅचही मिळतो, विकेटही पडते, असा टोला राऊतांनी विरोधी पक्षनेते संजय राऊत यांनी लगावला आहे. संजय राऊत यांच्यावर टीका करताना काँग्रेसने आधी त्यांनी युपीएमध्ये सामील व्हावं असा सल्ला दिला आहे. शरद पवार यांनी यूपीएचं नेतृत्व करावं या संजय राऊत यांच्या विधानाचा समाचार घेत शिवसेना यूपीएचा घटक पक्षही नाही, संजय राऊत यांना यूपीएच्या नेतृत्वाबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही, असे खडे बोल नाना पटोले यांनी सुनावले. संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का? असा चिमटाही त्यांनी काढला होता.
संजय राऊत यांना यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “शरद पवार या देशाचे नेते आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे काय आहेत हे सर्वांना माहिती आहे. युपीएसंबंधी बोलण्यासाठी युपीएमध्ये असायला पाहिजे असं काही नाही. युपीए राज्याचा विषय नाही, त्यामुळे राज्यातील, जिल्हा स्तरावरील लोकांनी केंद्रीय विषयावर बोलू नये. हा राष्ट्रीय विषय असून राष्ट्राच्या हितासाठी या देशात एका मजबूत विरोधी पक्षाची आघाडी स्थापन व्हायची असेल तर मी सांगितलेल्या भूमिकांवर चर्चा होणं गरजेचं आहे. हे जर महाराष्ट्रातील नेत्यांना कळत नसेल तर त्यांनी राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे”.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “हा दिल्लीतील चर्चेचा विषय असून महाराष्ट्र किंवा इतर राज्यांमध्ये ती होऊ नये. राष्ट्रीय विषय दिल्लीत चर्चिला जातो आणि तिथेच झाली पाहिजे. या विषयावर सोनिया गांधी, राहुल गांधी बोलणार असतील तर आम्ही त्यांना उत्तर देऊ. पण ते सुद्धा या विषयावर काही बोलत नसून चिंतन करत आहेत”.
“माझ्यावर कोणी टीका करत नसून ते आपल्या पक्षावरच टीका करत आहेत. या देशात जर एक उत्तम विरोधी पक्षांची आघाडी निर्माण झाली नाही तर तुम्ही भाजपाचा पराभव कसा करणार याचं उत्तर मला प्रश्न विचारणाऱ्यांनी द्यायला हवं. ते दिल्लीत येऊन द्यावं, महाराष्ट्रात देऊ नये. हा विषय राष्ट्रीय आघाडीचा आहे, राष्ट्रीय राजकारणातील आहे. जिल्हा किंवा तालुक्यातील नाही हे समजून घेतलं पाहिजे,” असंही संजय राऊत म्हणाले आहेत. युपीए मजबूत होऊ नये असं जर काँग्रेसच्या महाराष्ट्रातील लोकांना वाटत असेल तर त्यांनी स्पष्ट करावं अशी मागणीदेखील त्यांनी केली.
ममतांच्या प्रचाराला जाण्य़ाचा विचार…
शरद पवार पश्चिम बंगालला जाणार आहेत. माझा विचार आहे जाण्याचा. काँग्रेसने आक्षेप घेतलेला, परंतू पवार हे देशाच्या फायद्याचा त्यांच्या विवेकबुद्धीला पटणारा निर्णय घेतात. यामुळे भाजपाची प्रचार करण्याची पद्धत पाहता ममतांचे हात बळकट करणे गरजेचे आहे, असे राऊत म्हणाले.