मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाचे थैमान रोखण्यासाठी राज्यभर कठोर निर्बंध लागू केल्यानंतरही रुग्णसंख्या आटोक्यत येत नसल्यानं आज मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोखठोक भूमिका घेत लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन केलं जाण्याची दाट शक्यता आहे.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर कडक निर्बंध लावले. तसंच विकेंड लॉकडाऊनचा निर्णयही घेण्यात आला आहे. पण विविध उपाययोजना करुनही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळत नसल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी सर्वपक्षीय बैठक घेण्यात येतेय. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा विचार मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारमधील अनेक मंत्री करत आहेत. राज्यात लॉकडाऊनची वेळ आली आहे. लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठकीत अजित पवार, राजेश टोपे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हेदेखील बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत व्यापाऱ्यांच्या भूमिकेबाबत देखील चर्चा झाली.
लॉकडाऊन लावल्यास महिन्याभराच्या आत आपण परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो. पण एकमत झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही, असंही मत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे राज्यात संपूर्ण लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.
राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा
रेमडेसिवीर कसे उपलब्ध करता येईल, याबाबत राज्य सरकारने हस्तक्षेप करावा, चाचणी केल्यानंतर अहवाल तात्काळ मिळावे, संपूर्ण लॉकडाऊन केला तर जनतेचा उद्रेक होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत सागितले.