मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रीय स्वयंसेवक संघचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू आणि मुस्लिम धर्मीयांशी संबंधित एक मोठ विधान केले आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज हे एकच होते आणि ते भारतीय हिंदू असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
पुण्यात ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाउंडेशन आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, सर्व भारतीयांच्या एकतेचा आधार आपली मातृभूमी व देशाच्या गौरवशाली परंपरा आहेत. भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुसलमानांचे पूर्वज एकच आहेत. आपल्या दृष्टीने हिंदू हा शब्द आपली मातृभूमी, पूर्वज आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रतिशब्द आहे. म्हणूनच आम्ही प्रत्येक भारतीय नागरिक हिंदूच आहेत असे मानतो. कोणाच्याही मताचा येथे अनादर होणार नाही. परंतु आपणास मुस्लिम वर्चस्वाचा नव्हे तर भारतीय वर्चस्वाचा विचार करावा लागेल. राष्ट्रहितास प्राधान्य देऊन त्यादिशेने अग्रेसर होण्याकरिता सर्वांना सोबत पुढे जावे लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
मोहन भागवत म्हणाले की, भारतातील अल्पसंख्याक समुदायाला कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही, कारण हिंदूंचे कोणाशीही वैर नाही. ते म्हणाले, ‘हिंदू शब्द मातृभूमी, पूर्वज आणि भारतीय संस्कृतीच्या बरोबरीचा आहे. इतर मतांचा तो अनादर नाही. आपल्याला मुस्लिम वर्चस्वाचा नाही तर भारतीय वर्चस्वाचा विचार करावा लागेल. भारताच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे.
मोहन भागवत म्हणाले, ‘विदेशी आक्रमकांसोबत इस्लाम भारतात आला, हाच इतिहास आहे आणि तो तसाच सांगितला गेला पाहिजे. मुस्लिम समाजातील विवेकी नेतृत्वाने आततायी गोष्टींचा विरोध करायला हवा. कट्टरपंथीयांसमोर त्यांना आपली भूमिका ठामपणे मांडावी लागेल. हे कार्य निरंतर करावे लागेल. आपल्या सर्वांसाठी हा खडतर परीक्षेचा काळ आहे. जेवढ्या लवकर आपण हे कार्य आरंभ करू, तितकेच आपल्या समाजाचे नुकसान आपण टाळू शकू. भारत भविष्यात महाशक्ती होईल, ते इतरांना घाबरविण्यासाठी नाही. तर तो विश्वगुरूंच्या स्वरूपात विराजमान होईल. युगानुयुगे आपण जड आणि चेतन या दोघांच्या उत्थानासाठी प्रयत्नशील आहोत. हाच आमचा मूलभूत विचार असल्यामुळे आमच्यापासून कोणीही भयभीत होण्याची गरज नाही.