नाशिक (वृत्तसंस्था) अन्न व नगारी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात जाणार असल्याचं स्पष्ट केलं. यावर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली असून ज्यांना उच्च न्यायालयात जायचं आहे त्यांनी खुशाल जावं, असं म्हटलं आहे.
छगन भुजबळ काल नाशिकमध्ये दाखल झाले. यावेळी ढोल ताशे वाजवत आणि फटाके फोडून भुजबळांचं जंगी स्वागत करण्यात आलं. भुजबळांच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये प्रचंड गर्दी जमली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी पेढे भरवत, ढोलाच्या तालावर ठेकाही धरला. महिलांनी भुजबळांचं औक्षण केलं तर कार्यकर्त्यांनी त्यांना भला मोठा हार घातला. त्यानंतर भुजबळांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. याचवेळी त्यांना अंजली दमानिया यांच्या भूमिकेवर प्रश्न विचारण्यात आला.
“लोकशाही आहे, त्यांनी खुशाल हायकोर्टात जावं. आम्ही अधिक उजळ माथ्याने समोर येऊ”, असं छगन भुजबळ यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी हिंदीतला एक शेरही म्हटला. “मेरे खिलाफ होनेवाली बातो को मैं अक्सर खमोशी से सूनता हुँ, जवाब देने का हक मैने वक्त को दे रखा है”, अशा शब्दात भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.
राजकारणात शब्दाने शब्दाला उत्तर दिलं जातं आणि विचाराने विचाराला. परंतु, हल्लीच्या काळाज अडचणीत टाकण्याचा प्रकार सुरू झाला आहे. आता तर अधिकच अडचणीत टाकलं. त्यातूनच बाहेर वाकप्रचार सुरू झाला तुम्ही सरळ वागता की तुमचा भुजबळ करू. आता त्यांना तो वाकप्रचार वापरता येणार नाही. दुसरं काही तरी शोधावं लागेल, असा चिमटा त्यांनी काढला.