राधानगरी : राधानगरी धरणाच्या दाजीपूर भटवाडी बॅकवॉटर येथे दोन महिलांसह तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
सतीश लक्ष्मण टिपुगडे (२६, मूळ गाव रा. भैरीबांबर, ता. राधानगरी) हा गेली सात वर्षे तळंदगे, ता. हातकणंगले येथे सलूनचा व्यवसाय करत होता. याच्या दुकानाशेजारी अश्विनी राजेंद्र मालवेकर (३२, मूळ रा. सावर्डे, ता. कागल, सध्या रा. तळंदगे) या वडापाव विक्रीचा व्यवसाय करतात. बुधवारी राधानगरी येथे पर्यटनासाठी सतीश टिपुगडे याच्यासोबत अश्विनी मालवेकर, तिची मुलगी प्रतीक्षा राजेंद्र मालवेकर (१३) असे तिघे आले होते. ते भटवाडी येथे पाण्यात उतरले; पण पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
तत्पूर्वी सतीशने आपल्या पल्या नातेवाईकांच्या घरात भाकरी करण्यासाठी सांगितले होते; पण रात्री उशिरापर्यंत भाकरी नेण्यास सतीश आला नाही म्हणून नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली, पण तो आढळून आला नाही. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी सतीशची गाडी पाण्याशेजारी एका फार्म हाऊसजवळ आढळून आली. तेथे शोध घेतला असता सतीशचा मृतदेह पाण्यात आढळून आला. आणखी शोध घेतल्यानंतर अश्विनी व प्रतीक्षा या दोघींचे मृतदेहही आढळून आले. सतीश टिपुगडे विवाहित असून त्याला दोन अपत्य आहेत. दरम्यान, ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
















