जळगाव (प्रतिनिधी) सहकारी औद्योगीक वसाहतीमधील कंपनीतली टाकी साफ करतांना तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सहकारी औद्योगीक वसाहतीतल्या समृध्दी केमिकल या कंपनीत हे तिन्ही कामगार कामाला होते. तीन दिवसांपासून कंपनी बंद होती. यामुळे येथील टाकीमध्ये गाळ साचला होता. हा गाळ साफ करण्याचे तिन्ही कामगारांना सांगण्यात आले होते. यात पहिल्यांदा दिलीप गाळात अडकला. त्याला सोडविण्यासाठी हे दोन्ही जण गेले असता ते देखील यात अडकले. यातच गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी तिघांना तपासून मृत घोषीत केले.
प्राप्त माहितीनुसार रवींद्र उर्फ गोटू झगडू कोळी (वय ३० चिंचोली या. यावल), दिलीप अर्जुन सोनार (वय ५४ मूळ खिरोदा ह.मु. कांचन नगर) आणि आणि मयूर विजय सोनार (वय ३०, रा. कांचननगर, जळगाव) ही यातील तिन्ही मृतांची नावे आहेत.