मुंबई (वृत्तसंस्था) केरळात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन झाल्यानंतर मान्सूनने कर्नाटक किनारपट्टीच्या बहुतांशी भागात मजल मारली आहे. त्यानंतर गोव्याच्या सीमेवर मान्सून रेंगाळला आहे. वेळेआधीच महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, हा हवामान खात्याचा अंदाज देखील चुकला आहे. दरम्यान आजपासून कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच २७ जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उद्यापासून (ता. १०) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुण्यात आणि घाटमाथ्यावर ढगाळ वातावरण असून पावसाची रिपरिप सुरू आहे. पण उद्यापासून या शहरांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावू शकतो. मुंबईसह, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे जळगाव, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला आहे.
दरम्यान, विदर्भातल्या काही भागांमध्ये उष्णताही जाणवू शकते. चंद्रपूर गोंदिया, वर्धा, नागपूर, ब्रह्मपुरी या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा पारा वाढलेला असून नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागू शकतो. तर काही ठिकाणी ढगाळ हवामान होत असून, आज (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्र काही ठिकाणी तर मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज आहे.
उत्तर कोकण : उत्तर कोकणात आजपासून १२ जूनपर्यंत पावासाचा अंदाज देण्यात आला आहे. घाटमाथ्यावरच्या ठिकाणांवरही मुसळधार पाऊस होईल तर जिल्ह्यात ढगाळ वातावरण असेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
दक्षिण कोकण आणि गोवा : दक्षिण कोकण आज आणि उद्या तुरळक पावसाचा इशारा देण्यात आला असून १० आणि ११ जूनला बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यत आहे. तर १२ तारखेला मात्र मोजक्याच जिल्यांमध्ये पाऊस पडेल.
उत्तर मध्य महाराष्ट्र : हवामान खात्याने उत्तर मध्य महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
दक्षिण मध्य महाराष्ट्र : दक्षिण मध्य महाराष्ट्रातही हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाडा : मराठवाड्यालाही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहिल.
पूर्व-पश्चिम विदर्भ : पूर्व-पश्चिम विदर्भातही हवामान खायात्याकडून पावासाचा इशारा देण्यात आला असून बहुतांश जिल्ह्यांमध्ये उन्हाचाही तडाखा बसू शकतो.
राज्यात कधी येणार मान्सून?
खरंतर, राज्यात सध्या मान्सूनची प्रतिक्षा आहे. पण मान्सूनला राज्यात येण्यासाठी विलंब होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मान्सून अरबी समुद्रातच रेंगाळत होता. पण आता त्याने पुढे वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, मान्सूनने बंगालच्या उपसागरात पुढे चाल करत मंगळवारी (ता. ७) तमिळनाडूच्या काही भागातही प्रगती केली आहे.