नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील दूरसंचार कंपन्यांनी प्रीपेड प्लॅनमधील एसएमएसची सुविधा बंद केल्याने ग्राहकांना असुविधेचा सामना करावा लागत होता. यासंदर्भात ग्राहकांनी दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) कडे तक्रारी केल्या. या तक्रारींची दखल घेऊन ट्रायने दूरसंचार कंपन्यांना दणका दिला आहे. देशातील टेलिकॉम कंपन्यांनी मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी त्वरीत एसएमएस सुविधा सुरू करावी, असा आदेश ट्रायने दिला आहे.
काही टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना ‘प्रीपेड व्हाउचर’मध्ये ‘आउटगोइंग एसएमएस’ सुविधा उपलब्ध करून देत नसल्याच्या तक्रारी ट्रायकडे आल्या होत्या. त्यानंतर ट्रायनं अशा कंपन्यांच्या सेवा धोरणांवर आक्षेप नोंदवला आहे. ट्रायच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांच्या प्रीपेड खात्यांमध्ये पुरेशी रक्कम असूनही त्यांना ‘मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी’ सुविधेचा लाभ घेताना अडचणी येत आहेत. पोर्टेबिलिसाठी आवश्यक असलेला युनिक पोर्टिंग कोड मिळवण्यासाठी निश्चित केलेल्या १९०० या क्रमांकावर त्यांना एसएमएस पाठवता येत नाही. गेल्या काही दिवसांमध्ये अशा अनेक तक्रारी ट्रायकडे आल्या आहेत.
ट्रायनं जाहीर केलेल्या आपल्या सूचना पत्रात म्हटलं आहे की, ‘ग्राहकांना सेवा देणाऱ्या सर्व टेलिकॉम कंपन्यांनी, मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी रेग्युलेशन, २००९ अंतर्गत प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही श्रेणीतील मोबाइल फोन पोर्टेबिलिटी सुविधा द्याव्यात. ग्राहक वापरत असलेल्या व्हाउचरची किंमत विचारात न घेता, सर्वांना यूपीसीसंबंधित एसएमएस पाठवण्याची सुविधा दिली जावी. प्रीपेड व्हाउचर किंवा प्लॅनमध्ये मोबाइल नंबर पार्टेबिलिटीशी संबंधित एसएमएस पाठवण्याच्या सुविधेची तरतूद न करणं हे नियमांचं उल्लंघन असल्याचं ट्रायनं म्हटलं आहे.