बुलडाणा (वृत्तसंस्था) समृद्धी महामार्गावर एक खाजगी ट्रॅव्हल्स जळून खाक झाली असून या बसमधील २५ प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याने महाराष्ट्र हादरला आहे. अपघातग्रस्त बस नागपूरवरुन पुण्याकडे जात होती. मात्र सिंदखेडराजाच्या जवळ या बसचा भीषण अपघात झाला. या बसमध्ये ३२ प्रवासी बसले होते. त्यापैकी २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
बसचा दरवाजा गाडीखाली आल्याने प्रवाशी अडकले !
प्रवासी बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथील प्रवासी होती. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस होती. बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ ही बस एका खांबाला धडकली आणि त्यानंतर बस पलटी झाली. बस डाव्या बाजूला पलटी झाल्यानं दार बंद झालं आणि बाहेर पडणे प्रवाशांना अशक्य झालं. त्यामुळे या घटनेत २५ प्रवाशांचा मृत्यू झाला.
नागपूरहून पुण्याकडे जात होती बस !
विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE – 1819 क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. ३० जूनला नागपूरहून संध्याकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. १ जुलै च्या रात्री १.२२ मिनिटांनी धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली. त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवासी बस पेटली आणि हा अपघात झाला.
मृतदेहांची ओळख पटवणे कठीण !
या अपघातानंतर काही प्रवाशांनी काचा फोडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. काचा फोडून बाहेर आलेल्या प्रवाशांचा जीव वाचला आहे. आग मोठी असल्याने इतरांनाही त्यांना बाहेर काढणं शक्य नव्हतं. त्यामुळे या बसमधील 25 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. अपघातानंतर बसमधील डिझेल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पसरले. डिझेल सांडल्यामुळे बसला आग लागली. पोलिसांनी बसमधून 25 मृतदेह बाहेर काढले आहेत. तर 8 जण या अपघातातून सुखरुप बचावले आहेत. गंभीर भाजल्याने मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले आहे.
बस पुढे जाणाऱ्या डिझेल टँकरवर जाऊन आदळल्यामुळे आग !
बस रात्री 1.35 च्या सुमारास नागपूरहून पुण्याकडे जात असताना सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावानजीक एका खांबावर जाऊन आदळली. याबाबत ड्रायव्हरने सांगितले की, टायर फुटल्यानं बस खांबला जाऊन धडकली. त्याचवेळी डिझेल टँकचा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर गाडी सुमारे 30 ते 40 फुट पुढे जाऊन पलटी झाली आणि अचनाक गाडीत आग लागली. तसेच प्रवासी गाडीत झोपले होते. त्यामुळे गाडीचा अपघात झाला याबाबत अनेकांना कल्पना नव्हती.
मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक मदत !
या अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल.जिल्हा तसेच पोलिस प्रशासनाशी आम्ही संपर्कात असून तातडीने सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जात आहे. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बस एका पुलावर आदळली आणि त्यानंतर डिझेल टाकी फुटल्याने वाहनाला आग लागली.