
जळगाव (प्रतिनिधी) – पादचाऱ्यासह कामावर जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार लीलाधर मंगल पाटील (वय ३६, रा. कठोरा, ता. जळगाव) हे जागीच ठार झाले. तर पादचारी गंभीर जखमी झाले. त्यानंतर भरधाव कारने तीन वेळा उलटल्याची घटना बुधवार दि. २९ जुलै रोजी सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास ईच्छादेवी चौकात घडली. धडक दिल्यानंतर कारचालक तेथून पसार झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात जतिन संजय बोरसे (वय २१, रा. वाघनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील कठोरा येथे राहणारे लीलाधर मंगल पाटील हे गेल्या चार वर्षांपासून शहरातील चंदु अण्णानगर येथे वास्तव्यास होते. बुधवार दि. २९ जुलै रोजी नियमितप्रमाणे एमआयडीसीतील निर्मल पाईप कंपनीत कामावर जाण्यासाठी (एमएच १९, ईसी ९०८४) क्रमांकाच्या दुचाकीने निघाले होते. आकाशवाणी चौकातून ते इच्छादेवी चौकात आल्यानंतर अजिंठाचौकाकडून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १९, बीएल ७०७७) क्रमांकाच्या चारचाकीने सुरुवातीला त्यांना जोरदार धडक दिली, या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही धडक इतकी जोरदार होती की कारने सलग दोन ते तीन वेळा उलटली. हा भीषण अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
दुभाजकावर आदळून दुचाकीस्वारांना उडविले
दुचाकीस्वार लिलाधर पाटील यांना धडक देणाऱ्यापुर्वी भरधाव कार चालकांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ते दुभाजकाला आदळली. त्यानंतर समोरुन येणाऱ्या कन्हैया राजेश गारुंगे (वय ४६) यांना देखील धडक दिली. या अपघातात ते देखील जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
अपघाता नंतर कारचालकासह अन्य फरार
या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात मयत लिलाधर जाधव यांचे भाऊ गोपाल मंगल जाधव यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये अपघात झाल्यानंतर कार चालक जतिन संजय बोरसे (वय २१, रा. वाघनगर) हा कार सोडून घटनास्थळावरुन पळून गेला. आता त्याच्यासोबत कारमध्ये अजून काही जण होते, असा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे.
कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर
गोपाल जाधव यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत लिलाधर पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, आई-वडिल असा परिवार आहे. दरम्यान, लीलाधर पाटील यांचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणल्यानंतर नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. यावेळी घरातील कर्ता व्यक्ती गेल्यामुळे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला, त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
















