नाशिक (वृत्तसंस्था) शेतात शिरलेल्या माकडांना हुसकावून परतताना शेततळ्यात पाय घसरून पडल्याने दोन सख्ख्या भावांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तेजस आहेर (वय १२) व मानव आहेर (वय ९), अशी मयत भावंडाची नावे आहेत.
खामखेडा येथील बुटेश्वर शिवारात शेतकरी गणेश संतोष आहेर हे आपल्या डोंगराला लागून असलेल्या शेतात राहतात. त्यांची दोन मुले तेजस व मानव बुधवारी (दि. २०) दुपारी शेतात उन्हाळ कांदा काढणी सुरू असल्याने आई-वडिलांना मदतीसाठी गेले होते. त्यावेळी जंगलातून काही माकडे त्यांच्या शेतात शिरल्याने दोघे त्या माकडांना हुसकावत त्यांच्या पाठीमागे गेले होते. तेथून परतल्यानंतर दोघे, जंगलाला लागून असलेल्या सदाशिव शेवाळे यांच्या शेततळ्यातील पाणी पाहण्यासाठी गेले असता, तेजस याचा पाय घसरल्याने तो शेततळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी मानवने हात दिला. मात्र, तोही शेततळ्यात घसरून पडला. त्यांच्या सोबत असलेल्या चारवर्षीय बहिणीने शेतात पळत येत कुटुंबीयांना ही घटना सांगितली.
घटनेची माहिती मिळताच केदा आहेर व इतरांनी शेततळ्याकडे धाव घेतली. शेजारील शेतकरी हरेश शेवाळे यांनी दोघांना शेततळ्यातून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. तेजस जनता विद्यालयात इयत्ता सहावीत, तर मानव आहेर जिल्हा परिषद शाळा थळवस्ती येथे इयत्ता दुसरीत शिकत होता. सख्ख्या भावांचा एकाच वेळी दुर्दैवी मृत्यू झाल्याने गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मुलांचा मृतदेह बघताच आई-वडिलांनी काळीज चिरणारा आक्रोश केला.