औरंगाबाद (वृत्तसंस्था) दोन सख्खे भाऊ उन्हाळ्याची सुट्टी असल्याने मावशीच्या घरी आले होते. दरम्यान, शेतामध्ये असलेल्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेले असताना दोघांचाही बुडून मृत्यू झाला. स्वप्नील संतोष काळे (वय १५), सोहिल संतोष काळे (वय १३) अशी दुर्दैवी मृत भावंडाची नावे आहेत.
शेतातील कामासाठी काका व मावशी हे शेतात असताना पोहता येत असलेला मावसभाऊ व हे दोन्ही भाऊ पोहण्यासाठी शेततळ्यात उतरले होते. स्वप्नील व साहिल या दोन्ही भावंडाना पोहता येत नसल्याने ते दोघे शेततळ्यात असलेली ठिबकची नळी धरून पोहत असतानाच अचानक ठिबकची नळी तुटली अन् दोघे भाऊ पाण्यात बुडू लागले. मावसभावाने त्यांना बुडताना बघितले आणि घाबरून जोराने ओरडला परंतु जवळपास कोणी नसल्याने त्याचा आवाज कोणीही ऐकला नाही. दरम्यान स्वप्नील व सोहिल या दोन्ही दुर्दैवी भावंडचा बुडून मृत्यू झाला. शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या मार्गदशनाखाली अंमलदार संतोष पवार, पोलीस मित्र बाबा शेख यांनीही तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पोलीस पाटील उधलसिंग जारवाल राजपूत यांच्या सहकार्याने या दोन्ही भावांना लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्या केंद्रात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
औरंगाबादच्या गारखेड्यातील सूतगिरणी परिसरात राहणाऱ्या या दोन्ही भावांचे वडील संतोष भगवान काळे हे कामगार आहेत. दोन्ही मुलांच्या शाळेला उन्हाळ्याची सुट्टी असल्याने कालच मावशीकडे पाचपीरवाडी (ता. गंगापूर) येथे आणून सोडले होते. शेततळ्यात पोहता येत नसताना ठिबकच्या नळीच्या भरवशावर धरून पोहताना नळी तुटली अन् दोघे बुडाले. आता त्यांची आईवडील आणि एक लहान बहीण असा परिवार आहे. घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.