जळगाव (प्रतिनिधी) : केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी काल झालेल्या रेल्वे दुर्घटनेतील जखमींना गोदावरी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन त्यांची आस्थेने चौकशी केली. जखमींच्या नातेवाईकांशी संवाद साधून, त्यांनी त्यांना दिलासा देत सांगितले, “काळजी करू नका, शासनाकडून सर्व प्रकारची मदत केली जात आहे. जखमी लवकरच बरे होतील,” असे सांगून त्यांच्याबद्दल सदिच्छा व्यक्त केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. केतकी पाटील, तहसीलदार नीता लबडे, सह-जिल्हा शल्यचिकित्सक आकाश चौधरी, तसेच गोदावरी हॉस्पिटलचे डॉक्टर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
काल झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटल आणि विघ्नहर्ता रुग्णालय येथे प्रारंभिक उपचार करण्यात आले. त्यानंतर सर्व नऊ जखमींना गोदावरी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. जखमींच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेत असल्याची माहिती डॉ. केतकी पाटील यांनी मंत्री रक्षा खडसे यांना दिली.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही मंत्री महोदयांना रेल्वे दुर्घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी श्रीमती खडसे यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त करत, मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या.