जळगाव (प्रतिनिधी) हनी ट्रॅप प्रकरणात मनोज वाणी मोहरा तर विनोद देशमुख खरे सूत्रधार असल्याचा आरोप आज राष्ट्रवादी महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केला आहे.
हनी ट्रॅप प्रकरणाला मनी ट्रॅपचा रंग देणारे मनोज वाणी यांनी परवा घेतलेल्या पत्रकार परिषदेत अभिषेक पाटील व त्यांचा परिवारावर केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांनी मनोज वाणी हे निमित्त असून त्यामागील खरा सूत्रधार विनोद देशमुख असल्याचा आरोप केला आहे. आम्ही महीला आघाडीच्या वतीने कायदेशीर लढा उभारून नेहमी महिलांविषयी लांछानस्पद कुरापती करणाऱ्या विनोद देशमुख यांना चांगलीच अद्दल घडविल्याशिवय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देखील उपस्थित महीला कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
एकंदरीत मनोज वाणीपेक्षा महीला आघाडीच्या पदाधिकारीचा विनोद देशमुख यांच्यावरच अधिक रोष व्यक्त करतांना दिसून आले. अगदी त्यांना मारहाण करण्यापर्यंतची भाषा वापरण्यात आली. मनोज वाणी यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिलेल्या लेखी निवेदनात एका मुद्द्यात अभिषेक पाटील व कल्पना पाटील यांच्या संदर्भातील आरोपात विनोद देशमुख यांचा नामोल्लेख केला आहे. त्या एका मुद्यावरच कल्पना पाटील व महीला आघाडीच्या पदाधिकारी यांनी विनोद देशमुख यांना टार्गेट करत हनी ट्रॅप प्रकरणाला त्यांच्या दिशेने वळवून मनोज वाणी यांनी उपस्थित केलेल्या आरोपांना पडदेआड करत त्यास अभिषेक पाटील हे पुराव्यानिशी उत्तर देतील, असे सांगून पत्रकार परिषदेची सांगता करण्यात आली .