ठाणे (वृत्तसंस्था) मराठी रंगभूमीचे, चित्रपट सृष्टीचे ज्येष्ठ कलावंत रवी पटवर्धन यांचे शनिवारी रात्री निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
रवी पटवर्धन यांनी मराठी नाटके आणि मराठी चित्रपटांसह मालिकांमध्येही काम केले होते. भारदस्त व्यक्तिमत्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जवळ यामुळे त्यांना गावचा पाटील, पोलीस आयुक्त, न्यायाधीश, किंवा खलनायकी भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत ते भूमिका साकारत होते. ही त्यांची अखेरची मालिका ठरली. बालगंधर्व हे १९४४ साली झालेल्या नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष होते, तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. त्या नाट्यमहोत्सवातल्या बालनाट्यात अवघ्या साडेसहा वर्षांच्या वयाच्या रवी पटवर्धनांनी भूमिका केली होती. आरण्यक हे नाटक त्यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केले आणि वयाच्या ८२ व्या वर्षीही ते ह्या नाटकात तीच धृतराष्ट्राची भूमिका करत होते. वयपरत्वे येणाऱ्या विस्मरणाच्या मोठ्या धोक्यावर विजय मिळवून, मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्र शिकून घेतले. या विषयावरच्या साहित्यावर खूप अभ्यास केला व त्या शास्त्राचा वापर करून स्वतःच्या अनेक व्याधींवर मात केली. शिवाय आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्ती आणि व्याधिग्रस्तांवरही रवी पटवर्धन यांनी या उपचारपद्धतीचा वापर केला व त्याचा त्यांना खूप फायदा करून दिला.
काल रात्री पटवर्धनांना श्वास घ्यायला त्रास होत होता. म्हणून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मार्च मध्येही त्यांना आरोग्य विकाराचा झटका आला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, मुलगी, जावई, चार नातवंडे असा परिवार आहे. आज सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.