धरणगाव (जयेश माळी) मागील २० ते २५ दिवसापासून शहरात पाणी पुरवठा होत नसल्यामुळे आज संतप्त महिलांनी पालिकेवर मोर्चा काढला. शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा उषाताई गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात पालिकेवर मोर्चा धडकला. परंतू याठिकाणी जबाबदार अधिकार उपस्थित नसल्यामुळे नागरिक अधिकचे संतप्त झाले होते. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला घातला हार घालत कॅबीनला टाळे ठोकून आंदोलनकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त केला.
शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा उषाताई गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात आज सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास पालिकेवर धडकला. या मोर्चात संतप्त महिला, नागरीक अबालवृद्ध शेकडोंच्या संख्येने हंडा व मडक्यासह सहभागी होऊन पालिका प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. परंतू पालिकेत जबाबदार अधिकार उपस्थित नसल्यामुळे नागरिक अधिकचे संतप्त झाले होते. सणासुधीच्या काळात देखील २० ते २५ दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. तर पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत न केल्यास मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारी कार्यालयात हजर नसल्यामुळे संतप्त महिलांनी थेट त्यांचे कॅबीन गाठले. यावेळी उषाताई वाघ यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घातला. त्यानंतर थेट कॅबीनला टाळे ठोकले. यावेळी काही महिलांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कॅबीन बाहेर हंडे फेकत ठिय्या मांडला होता. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, राजेंद्र ठाकरे, धीरेंद्र पुरभे, भरत महाजन, लक्ष्मण महाजन, शरद माळी, संतोष सोनवणे, गोविंद कंखरे, भागवत चौधरी, कृपाराम महाजन, हेमंत महाजन, महेश चौधरी, जयेश महाजन, दिलीप महाजन, बाळू महाजन, रामकृष्ण महाजन, बापू महाजन, विलास पवार, सुनील जावरे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. दरम्यान, मुख्याधिकारी येत नाही, तोपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन करू अशी भूमिका घेत महिला पालिकेत ठाण मांडून बसलेल्या होत्या.