मुंबई (वृत्तसंस्था) परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा तिढा सुटावा यासाठी पगारवाढीची घोषणा केली. पण या पगारवाढीच्या घोषणेनंतरही कामगार संप मागे घेण्याच्या तयारीत नाहीत. मागण्या मान्य झाल्यावर लढाई थांबवायची असते. कामगारांना कामावर यायचे आहे, उद्या सकाळपर्यंत वाट पाहणार आहोत, त्यानंतर कारवाई अटळ आहे, असा इशारा अनिल परब यांनी संपकऱ्यांना दिला आहे.
राज्य सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. तुमच्या ज्या काही मागण्या मान्य झाल्या आहेत. आता मागण्या मान्य झाल्यावर लढाई थांबवायची असते. कामगारांना कामावर यायचे आहे. आम्ही उद्या सकाळपर्यंत वाट पाहून त्यानंतर महामंडळ निर्णय घेईल की पुढं कसं जायचं ते. संप मागे घेवून कामावर रूजू व्हावे. जे संपात राहतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा आता अनिल परब यांनी दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारचे ऐकावे. तुटेपर्यंत तुटू नये, नंतर जोडता नाही येणार. जर काही राहिले असेल तर समितीसमोर मांडा. संप करून जनतेला वेठीला धरू नका. माझा संबंध कामगारांशी आहे, त्यांची लिडरशीप कुणी करायची हा त्यांचा प्रश्न आहे, यावेळी अनिल परब म्हणाले.
दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे घेतले आहे, अशी माहिती आंदोलनाचे नेतृत्व करणारे सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळाकर यांनी यांनी दिली. आझाद मैदानातलं आंदोलन तात्पुरतं मागे घेत आहे. पुढील निर्णय हा कामगारांनी घ्यायचा आहे. पगारवाढ हा कामगार लढ्याचा ऐतिहासिक निर्णय आहे. सरकार एक पाऊल मागे आले आहे, असे सदाभाऊ खोत म्हणाले. दरम्यान, खोत, पडळकरांना आंदोलनातून आझाद केले आहे, गुणरत्न सदावर्ते म्हणाले. खोत, पडळकरांची स्थगिती स्वतःपुरती आहे, असेही सदावर्ते म्हणाले.