मुंबई (वृत्तसंस्था) राज्य शासनाने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत नाईट कर्फ्यु लावला आहे. त्यामुळे यंदाचा नववर्ष साजरे कसे करावे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्या संदर्भात आता राज्याच्या गृहखात्यानं एक नियमावली जाहीर केली आहे. त्यात सर्व नियम देण्यात आले असून नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे असे आवाहन करण्यात आले आहेत.
जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी काऊंटडाऊन सुरु झाले आहे. अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. नुकतंच राज्य सरकारने ३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार यंदा नागरिकांनी घराबाहेर न पडता घरच्या घरी साधेपणानेच नववर्षाचे स्वागत करा, अशी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन सूचना जारी केली आहे. दरवर्षी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दोन्ही दिवशी जगभरात मोठ्या उत्साहाचे वातावरण असते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या ३१ डिसेंबर २०२० आणि नववर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे. येत्या ३१ डिसेंबरला दिवसभर संचारबंदी नसली तरीदेखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि १ जानेवारी २०२१ रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने अनेक नागरिक घराबाहेर पडतात. मात्र नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे, असे या मार्गदर्शक सूचनेत नमूद करण्यात आले आहे.
३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी काही नियम
नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करा.
समुद्रकिनारी, बागेत, रस्त्यावर मोठ्या संख्येने गर्दी करु नये.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा.
६० वर्षावरील नागरिकांनी आणि दहा वर्षाखालील मुलांनी घराबाहेर जाणे टाळा.
धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये.
मिरवणुका काढू नये.
धार्मिक स्थळी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा
फटाक्यांची आतिषबाजी करु नये.
नागरिकांनी ३१ डिसेंबरच्या दिवशी समुद्रकिनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी करु नये. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर होईल, याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
विशेषत: मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये देखील अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होते. त्या दृष्टीने कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षावरील नागरिकांनी आणि दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. दरवर्षी नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी ठिक-ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी केली जाते. मात्र यंदा फटाक्यांची आतषबाजी करण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे. अशा सूचना गृह विभागामार्फत देण्यात आल्या आहे. नागरिकांनी यांचे पालन करावे, असे आवाहन गृह विभागामार्फत करण्यात आले आहे.