जळगाव (प्रतिनिधी) मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या चिंचोली येथील ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली. करण जयराम पवार असे मृत बालकाचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, धानवड गावाजवळील तलावामध्ये आज दुपारी चार वाजेच्या सुमारास करण हा आपल्या दोन मित्रांसह पोहायला गेला होता. करण पाण्यात पोहायला उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक माहिती समोर येत आहे.
तलावात गाळ असल्यामुळे करण वर येवू शकला नाही. त्यामुळे त्याच्यासोबत असलेल्या दोघां मित्रांनी आरडा-ओरड सुरु केली. मुलांचा आवाज ऐकून जवळच काम करणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतू दुर्दैवाने तोपर्यंत करण याचा बुडून मृत्यू झाला होता. सायंकाळी मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणल्यानंतर कुटूंबियांसह ग्रामस्थांची गर्दी झाली होती. करणच्या अचानक मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर पसरला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.