मुंबई (वृत्तसंस्था) मी कधीही नाराज नव्हतो. मी स्वत:ला मुख्यमंत्री समजतो, हे मंत्री काय करता? निश्चित मी मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. परंतु माझी नाराजी नव्हती, अशा शब्दात आ. किशोरआप्पा पाटील यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवली आहे.
मंत्रिमंडळ कधी होणार याबाबत अद्यापही ठोस सांगितले जात नाही. त्यातच मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार रखडल्याने शिंदे गटातील आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे. आमदार किशोर पाटील नाराज असल्याच्या बातमी समोर आली होती. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार किशोरआप्पा पाटील म्हणाले की, मला अजून सूत्र कळाले नाही. हे सूत्र कुठून येते? मी कधीही नाराज नव्हतो. मी स्वत:ला मुख्यमंत्री समजतो, हे मंत्री काय करता? निश्चित मी मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. परंतु माझी नाराजी नव्हती. आजही नाही आणि उद्याही राहणार नाही. संधी मिळाली तर नक्कीच त्याचं सोने करेन. मला जो विभाग मिळेल त्यामाध्यमातून राज्याच्या हिताचे निर्णय घेईन पण मी नाराज नाही एवढं नक्की असा खुलासा करायला ते विसरले नाहीत. तसेच अंधेरी पोटनिवडणुकीबाबत भारतीय जनता पार्टीने उमेदवार मागे घेण्याचा जो निर्णय घेतला तो अतिशय चांगला आहे. मी त्यांचे मनापासून कौतुक करतो असंही आ.पाटील यांनी म्हटलं आहे.
अडीच वर्षात जेवढ काम झालं नाही, तेवढ काम 100 दिवसांत भाजप आणि शिंदे गटाच्या युतीतील सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. राज्याच्या विकासाचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. 100 दिवसातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला कारभार म्हणजे, नायक या हिंदी चित्रपटाचा प्रत्यय येतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आमदार किशोर पाटील यांनी नायक चित्रपटाच्या अभिनेत्याची थेट उपाधी देऊन टाकली आहे, तर दुसरीकडे अडीच वर्षात त्यांना जे जमलं नाही, ते आमच्या सरकारनं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस यांनी करुन दाखवलं.”, असा टोलाही आमदार किशोर पाटील यांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.
















