नाशिक (वृत्तसंस्था) लक्ष्मीमुक्ती या शासकीय योजनेअंतर्गत वडिलांच्या सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावण्यासाठी ९ हजारांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी पांडुरंग हांडू कोळी व खासगी इसम विठोबा जयराम शिरसाठ हे एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे.
येवला तालुक्यांतील सावरगाव येथील मंडळ अधिकारी पांडुरंग हांडु कोळी यांनी तक्रारदाराकडे १५ हजारांच्या लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक कार्यालयात तक्रार दिली. सदर तक्रारीवरुन एसीबीच्या पथकाने पडताळणी करून सापळा रचला असता पांडुरंग हांडू कोळी यांनी तक्रारदाराकडे १५ हजार रुपये लाचेची मागणी केली व तडजोडीअंती ९ हजार रुपये देण्याचे ठरले. ही लाचेची रक्कम दि.०७ रोजी पांडुरंग कोळी यांच्या सांगण्यावरून विठोबा जयराम शिरसाठ (खासगी इसम, रा. ठाणगाव ता. येवला जि. नाशिक) यांनी स्वीकारल्याने त्यांना पकडण्यात आले.
दोघांविरुध्द येवला तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक मीरा आदमाने करीत आहेत.