पहूर, ता. जामनेर (प्रतिनिधी) येथील वाघूर नदीच्या पुलावर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीला आयशर वाहनाने धडक दिल्याने विद्यार्थिनीच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी नदीवरील पुलाचे काम तत्काळ करावे, अशी मागणी केली.
सायकलवर शाळेत जातांना अपघात !
लेले नगरमधील रहिवासी व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक तथा पत्रकार शंकर रंगनाथ भामेरे हे आपली कन्या ज्ञानेश्वरी हिला सोबत घेऊन सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जात होते. दोघेही सायकलवर शाळेत जात असताना वाघूर नदीपुलावर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रक (एमएच- २३, एयू ५५८२) ने जबर धडक दिल्याने दोघेही सायकलवरून शंकर भामेरे यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, ज्ञानेश्वरी भामेरे या ११ वर्षीय पाचवीतील चिमुकलीला डोक्याला गंभीर इजा झाल्याने तिचा मृत्यू झाला.
ग्रामस्थांची रूग्णालयात मोठी गर्दी !
ज्ञानेश्वरी ही शाळेत अत्यंत हुशार मुलगी होती. विविध स्पर्धामध्ये सहभाग घेऊन तिने प्रावीण्य मिळवले होते. आज ही ती जळगाव येथील विवेकानंद प्रतिष्ठानमधील कवी संमेलनात सहभागी होण्यासाठी जात होती. मात्र, दुर्दैवाने तीचा पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. गावातील नागरिकांच्या सहकार्याने जखमी शंकर भामेरे व ज्ञानेश्वरी हिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी डॉ. नजमोद्दीन तडवी यांनी ज्ञानेश्वरी भामेरे हिचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी रूग्णालयात मोठी गर्दी केली होती. या प्रकरणी ट्रक चालक सुनील सोनवणे (रा. अंजनवती, ता. बीड) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या अपघाताला कारणीभूत असलेल्या रस्त्याच्या ठेकेदारावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. पहूर येथील वाघूर नदीवरी पुलाचे काम बऱ्याच वर्षापासून सुरू आहे. ते अद्याप पूर्ण झालेले नाही. पुलाच्या दोन्ही बाजूनी खड्डे पडले असल्याने येथे बरेच अपघात झाले आहेत.