नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा जगाला कोरोनाव्हायरसविषयी सावध केले आहे. कोरोना महामारीचं दुसरं वर्ष आणखी भयंकर असेल. पहिल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षात अधिक लोकांचे जीव जातील. त्यामुळे हे वर्ष अधिक जीवघेणं असेल, असा इशारा दिला आहे.
डब्ल्यूएचओचे प्रमुख ड्रोस अदनोम घेब्रेयियस यांनी सांगितले की, WHO कडून कोव्हिड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासाठी भारताला मदतही दिली जात आहे. अनेक ठिकाणी तात्पुरते रुग्णालय, हजारो ऑक्सिजन केंद्र, मास्क आणि इतर वैद्यकीय सेवांचा पुरवठा केला जात आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती ही चिंताजनक आहे. भारतातील अनेक राज्यात कोरोना रुग्ण, रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्यांची संख्या, मृत्यूची संख्या वाढत आहेत. त्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना महामारीचं दुसरं वर्ष आणखी भयंकर असेल. पहिल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षात अधिक लोकांचे जीव जातील. त्यामुळे हे वर्ष अधिक जीवघेणं असेल. कोरोना महामारीचं स्वरुप अधिक तीव्र होत असून त्यामुळे दुसऱ्या वर्षात कोरोनाचा विषाणू अधिक जीवघेणा होईल, असं टेड्रोस म्हणाले.
दरम्यान अनेक श्रीमंत देशामध्ये आता लहान मुलांना तसेच किशोरवयीन मुलांना कोरोनाची लस दिली जात आहे. तर दुसरीकडे गरीब देशांमध्ये आता कुठे आरोग्य कर्मचारी आणि गरजू लोकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. तरुण आणि निरोगी लोकांना लस देण्याऐवजी त्यांनी कोवॅक्स ग्लोबल व्हॅक्सिन-शेअरिंग योजनेस त्यांचे डोस दान करावेत. तसेच देशातील गरजू लोकांचे कोरोनापासून संरक्षण करावे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अदनोम घेब्रेयियस यांनी सांगितले.