मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बमुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये हालचालींना वेग आला आहे. खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत ‘परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून’, “दूध का दूध, पानी का पानी” करावे अशी मागणीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची बुधवारी रात्री महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची न्यायालयीन चौकशी करण्याचा महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतल्याचे कळत आहे. निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी होणार आहे. त्यामुळे लवकरच चौकशी आयोगाची घोषणा होणार आहे.
अनिल देशमुख यांचं ट्वीट
अनिल देशमुख यांनी रात्री १२ वाजून १८ मिनिटांनी एक महत्त्वाचं ट्वीट केलं आहे. ‘मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, “दूध का दूध, पानी का पानी” करावे अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन. सत्यमेव जयते…’, असे देशमुख यांनी या ट्वीटमध्ये नमूद केले आहे. या संदर्भात २१ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांना पाठवलेले पत्रही या ट्वीटसोबत देशमुख यांनी जोडले आहे.
दरम्यान, बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर फक्त कॅबिनेट मंत्री आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याच उपस्थितीत सर्व मंत्र्याशी महत्त्वाची चर्चा झाली. या चर्चेत अर्थातच भाजपकडून सातत्याने होत असलेल्या गंभीर आरोपांवर चर्चा करण्यात आली.
निवृत्त न्यायमूर्तींमार्फत गृहमंत्र्यांची चौकशी
परमबीर सिंग यांनी यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे वादळ उठलं होतं. ते वादळ अजूनही घोंघावत आहे. भाजप नेत्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुखांना क्लीन चिट देत चौकशीची किंवा राजीनाम्याचीही गरज नसल्याचं सांगितलं. पण बुधवारी रात्री अखेर राज्य सरकार या प्रकरणात एक पाऊल मागे गेल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार निवृत्त न्यायमूर्तींमार्फत गृहमंत्र्यांची चौकशी केली जाणार आहे.