मुंबई (वृत्तसंस्था) भाजपा आमदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा सुरु केला तेव्हा ‘आम्ही करुन दाखवलं’ असं म्हणत श्रेय घेतलं, मग आता हा विमा बंद पडला आहे, त्याचं श्रेय कुणाला द्यायचं असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.
कोरोनाकाळात स्वत:च्या कौतुकाचे पोवाडे गायिले, पण जे खरे कोव्हिड योद्धे आहेत, त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नाचं काय? वैद्यकीय गटविमा योजना २०१७ पासून बंद आहे. ही योजना सुरु केली तेव्हा वर्तमानपत्रात बातम्या आल्या की ५ लाखापर्यंत विमाकवच दिलं. आता ही योजना बंद पडली आहे, त्यामुळे जर तुम्ही योजना सुरु करण्याचं श्रेय घेत असाल तर बंद पडल्याचं श्रेय कोण घेणार, असा प्रश्न नितेश राणे यांनी विचारला आहे.
आपल्या पत्रात नितेश राणे म्हणतात, “आपले सरकार कोविडमधील आपल्या कामगिरीबाबत स्वतःच्याच कौतुकाचे पोवाडे गातात आणि इतकेच नाही तर आपल्या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार कोविड काळातील कामगिरीसाठी ‘सर्टीफिकेट ऑफ कमिटमेंट अवार्ड’ प्राप्त करून घेतात. पण जे खरे कोविड वॉरिअर म्हणजे जे महापालिकेचे कर्मचारी आपल्या जीवाची आणि आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता तत्परतेने कर्तव्यासाठी घराबाहेर पडतात. अशा कर्मचाऱ्यांसाठी आपण काय करत आहात? आपल्या हस्ते सुरू करण्यात आलेली गटविमा योजना पूर्णपणे बंद पाडण्यात आली आहे. हे आपणास माहित नाही का?”
ते पुढे म्हणतात, “जेव्हा ही योजना सुरु केली तेव्हा याचे श्रेय आपण व आपल्या पक्षाने घेतले होते.आम्ही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाच लाखांपर्यंतच्या विम्याचे कवच दिले, अशाप्रकारच्या बातम्या वृत्तपत्रातून तसेच इतर माध्यमातून प्रकाशित केल्या. मग जेंव्हा ही योजना बंद झाली आहे, तर मग याचे श्रेय कुणाला द्यायचे? आपण आणि आपला महापालिकेतील सत्ताधारी पक्ष जसे ‘करून दाखवले’चे श्रेय घेतात, त्याचप्रमाणे ‘बंद करून दाखवले’ याचेही श्रेय घेणार का?”
आपल्याला हस्ते शुभारंभ केलेली योजना आपल्यालाच सत्ताधारी पक्षाच्या उदासिनतेमुळे बंद झाली, असा आरोपही नितेश राणे यांनी आपल्या पत्रात केला आहे. “जर ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्याची मानसिकता नसेल किंबहुना या योजनेचा लाभ कायमचा बंद करण्याचा निर्णय आपल्यालाच सत्ताधारी पक्षाने घेतला असेल तर त्याप्रकारे त्याची जाहीर घोषणा करून टाकावी. जेणेकरून कर्मचारी स्वत: विमा काढतील. पण त्यांच्या भावनांशी आणि त्यांच्या परिवारच्या भविष्याशी सत्ताधारी पक्षाने स्वताच्या अर्थकारणासाठी खेळू नये”, असंही ते आपल्या पत्रात म्हणाले आहेत.