नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान सुरूच असून, जवळपास सर्वच राज्यांमध्ये कोरोनानं हातपाय पसरले आहेत. देशात गेल्या २४ तासांत २ लाख ७३ हजार ८१० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर १ हजार ६१९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णसंख्येचा आकडा जाहीर केला असून, देशात रुग्णवाढीचा नवा उच्चांक नोंदवला गेला आहे. चिंतेत टाकणारी गोष्ट म्हणजे अवघ्या २४ तासांत देशात मृत्यूच्या संख्येतही मोठी वाढ झाल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत २ लाख ७३ हजार ८१० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत देशात १ हजार ६१९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी दिवसभरात १ लाख ४४ हजार १७८ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. देशातील एकूण मृत्यूचा आकडा आता १ लाख ७८ हजार ७६९ वर पोहोचला असून, १२,३८,५२,५६६ नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयातील सुविधांवर प्रचंड ताण येऊ लागला आहे. बेड, आयसीयू बेड आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यासह रेमडेसिवीर इंजेक्शनची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे दिल्ली, महाराष्ट्र, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यासह काही राज्यातील परिस्थिती बिकट बनली आहे.