नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव सध्या जगभरात पाहायला मिळत आहे. अशातच देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ५७ हजार २२९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून ३४४९ रुग्णांचा जीव गेला आहे. दरम्यान ३,२०,२८९ लोक कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील २४ तासांतील आकडेवारी जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेली आकडेवारी काहीसा दिलासा देणारी असली, तरी मृत्यूंच्या बाबतीत चिंता कायम आहे. देशातील कोरोना रुग्णवाढ मंदावली असल्याचं दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात ३ लाख ५७ हजार २२९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत ३ लाख २० हजार २८९ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. म्हणजे नवीन रुग्ण आणि घरी परतलेले रुग्ण ही संख्या दिलासा देणारी आहे. मात्र, देशात दररोज होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत कोणतीही घट झाली नसल्याचं दिसत आहे.
देशात गेल्या २४ तासांत ३ हजार ४४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबळींचा संख्या दोन लाख २२ हजार ४०८ इतकी झाली आहे. तर देशात सध्या ३४ लाख ४७ हजार १३३ रुग्ण उपचाराधीन आहेत. कोरोना मृत्यूंच्या यादीत जगात भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत अमेरिका (५,९१,०६२) पहिल्या क्रमांकावर आहे, तर ब्राझील (४,०७,७७५) दुसऱ्या क्रमांकावर आहे.
३ मे रोजीच्या आकडेवारीनुसार २४ तासांत देशात कोरोनामुळे ३,४१७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मृतांची एकूण संख्या दोन लाख १८ हजार ९५९ वर पोहोचली होती. त्यात आता आणखी तीन हजार ४४९ रुग्णांची भर पडली आहे. कोरोनातून आतापर्यंत एक कोटी ६२ लाख ९३ हजार ००३ जण बरे झाले असून, मृत्युदर १.१० टक्के इतका आहे. देशातील एकूण मृत्यूपैकी ७० हजार २८४ मृत्यू महाराष्ट्रातील आहेत.
राज्यात सोमवारी ४८,६२१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात सोमवारी कोरोनाबाधित रुग्णसंख्येत काहीशी घट झाली आहे. राज्यात काल ४८ हजार ६२१ कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. तर ५९, ५०० कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. सध्या राज्यात ६ लाख ५६ हजार ८७० रुग्णांना उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत ७० हजार ८५१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात कालपर्यंत एकूण ४०,४१,१५८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान काल ५६७ कोरोनाबाधित रुग्णांनी आपला जीव गमावला.