नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक होत आहे. गेल्या २४ तासांत देशात १,५२,८७९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या आज आठशेच्या पार गेली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९० हजार ५८४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. २४ तासांत ८३९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात शनिवारी दिवसभरात ५५ हजार ४११ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर ३०९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.७२ टक्के इतका आहे. ५३ हजार ००५ रुग्ण कोरोनातून बरे देखील झाले. राज्यात आजपर्यंत एकूण २७,४८,१५३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८२.१८ टक्के एवढे झाले आहे.