यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील सावखेडा सिम जवळील निंबादेवी धरणात दोन बालकं बुडाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. दरम्यान, १४ वर्षीय बालकाचा मृतदेह धरणातून बाहेर काढण्यात आलाय तर १० वर्षीय बेपत्ता बालिकेचा अद्याप शोध लागलेला नाही. ही दोन्ही बालके गुरांना धरणावर पाणी पाजण्यासाठी आले होते.
सावखेडासीम गावाजवळ निंबादेवी धरण आहे. या धरण परिसरात मंगळवारी सायंकाळी गुरे चारण्यासाठी निमछाव आदिवासी वस्तीवरील बालके आली होती. यावेळी आसाराम शांतीलाल बारेला ( वय १४) व नेनू किसन बारेला (वय १०) हे दोघे पाण्यात उतरले. मात्र, खोलीचा अंदाज न आल्याने ते दोघे धरणात बुडून बेपत्ता झाले. हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यांनी सावखेडा सिम पोलिस पाटील पंकज बडगुजर यांना माहिती दिली. यानंतर बडगुजर हे ग्रामस्थांना हे घेऊन धरणावर पोहोचले. अंधार पडण्यापूर्वी शोधमोहीम राबवून आसाराम शांतीलाल बारेला याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. पण नेनू बारेला या बालिकेचा शोध लागला नाही. दरम्यान, घटनेची मिळताच दोघं मुलांची पालक आणि नातेवाईक घटनास्थळी पोहचले होते. पालकांनी एकच हंबरडा फोडला होता.