यावल (किरण माळी) यावल वन विभाग कार्यक्षेत्रातून म्हणजेच महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात चंदन व कडु लिंबाच्या लाकडांची तस्करी करणाऱ्या एका ट्रकला यावल वन विभागाने घेतला ताब्यात घेतला आहे. दरम्यान, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दोन चोरटे फरार झाले आहेत.
यावल वन विभागाने ताब्यात घेतले चंदनाचे लाकूड चंदन व कडु लिंबाच्या लाकडांची वाहतूक, तस्करी करणारा ट्रक यावल वनविभागाच्या भरारी गस्त पथकाने मंगळवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास खानापूर जवळ पकडल्याने अवैध सागवानी व इतर मुल्यवान लाकडाची तस्करी करणाऱ्यामध्ये मोठी खळबळ उडाली. या सोबत वन विभागातील अधिकारी कर्मचारी व गस्ती पथका बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
यावल वनविभागाचे गस्ती पथकाने रावेर तालुक्यात अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर खानापुर गांवाजवळ एका लाकडाच्या ट्रकची तपासणी केली असता त्यांना काही मोटरसायकल चालकांच्या हालचालीवर संशय आला. वनविभागाच्या पथकाने कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांना जवळच्या ज्वारीच्या शेतात लपवून ठेवलेले ४० किलो वजनाचे २३ घनफुट चंदनाचे सुमारे ४० हजार रुपये किमतीचे चंदनाचे मौल्यवान लाकुड आढळून आले.घटनास्थळावरील चंदनचे लाकूड यावल वनविभाने ताब्यात घेतले असले तरी चंदन लाकूड तस्करी करणाऱ्यांनी मात्र गस्ती पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या डोळ्याला आणि हाताला चंदन लावून घटनास्थळावरुन पद्धतशीरपणे सिनेस्टाईल पद्धतीने पलायन केले. म्हणजे चंदन तस्करी करणारे आरोपी फरार झाले. यामुळे यावल वन विभागाच्या कारवाईबाबत संपूर्ण यावल रावेर तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
यावल वन विभागाचे फिरते गस्त पथकाने चंदन पकडण्यापूर्वी सायंकाळच्या सुमारास खानापुर जवळ ट्रक (एम.एच. १९ झेड ६८३५) जप्त केला. त्या ट्रकामधून २४ हजार रुपये किमतीचे १८ टन वजनाचे १२ घनमीटर जळावू लाकुड ताब्यात घेतले असून ट्रक वनविभाच्या रावेर डेपोत जमा केला.सायंकाळच्या सुमारास लिंबाच्या लाकडांच्या ट्रकवर तर रात्री दोनच्या सुमारास चंदनाचे लाकूड ताब्यात घेतले. ही कारवाई यावल वन विभागाच्या भरारी पथकातील वनक्षेत्रपाल विशाल कुटे, वनपाल एस.आर.पाटील, एन.व्ही.देवरे,पोलिस शिपाई एस.आर.तडवी,वाय.डी.तेली यांनी कारवाई केली आहे.या कारवाईच्या ठिकाणापासून रावेर वन विभागाचे चेक पोस्ट हाकेच्या अंतरावर आहे.परंतु अवैध लाकूड वाहतूक आणि तस्करीकडे रावेर येथील वन अधिकारी कर्मचारी यांचे जाणून बुजुन दुर्लक्ष आहे का ?असा यावल रावेर तालुक्यात प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रावेर तालुक्यातुन म्हणजे महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात अशाच प्रकारे सागवानी लाकडांची मोठ्या प्रमाणात अवैध तस्करी होते का ? रावेर वनविभागाचे खानापुर जवळ चेकपोस्ट असून यावर आळा घालण्याची जबाबदारी वनक्षेत्रपालांनी नाकेदार यांच्यावर दिली असतांना संबंधित काही अधिकारी आणि नाकेदार यांच्या संगनमतामुळे वनविभागाच्या चेकपोस्टवर अवैद्य लाकडाची तपासणी केली जात नाही का? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून यावल वन विभागाच्या गस्ती पथकासह वन विभाग काही अधिकारी कर्मचारी यांच्या कर्तव्या बाबत वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
















