जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील संशोधन विभागाची वाटचाल गोगलगायीच्या गतीने होत असल्याचा आरोप करत संशोधकांचे भवितव्य अंधारात असल्यामुळे कुलगुरूंनी जबाबदारी पेलत नसेल तर राजीनामा द्यावा, अशी मागणी पतित पावन संघटनेचे मनोज दयाराम चौधरी यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
पतित पावन संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विद्यापीठाने पीएचडी पूर्वपरीक्षा अर्थात पेटचा फॉर्म भरण्याची मुदत २९ एप्रिल २०१९ ते २० मे २०१९ अशी जाहीर केली. विद्यापीठाच्या पीएचडीसाठी च्या २२ नोव्हेंबर २०१८ च्या नियमावलीनुसार पेट परीक्षा घेण्याआधी मार्गदर्शकांची यादी प्रसिद्ध करणे आवश्यक होती. परंतु मार्गदर्शकांची यादी विद्यापीठाकडून प्रसिद्ध करण्यात आली नाही. त्यानंतर १ जून २०१९ रोजी हॉल तिकीट मिळणार होते व परीक्षेची तारीख ९ ते १२ जून होती. परंतु विद्यापीठाकडून परीक्षेची तयारी न झाल्याने नेट-सेट परीक्षा असल्याच्या नावाखाली परीक्षेचे वेळापत्रक जूनच्या अखेरीस प्रसिद्ध करतील, असे विद्यार्थ्यांना कळविण्यात आले. जून २०१९ अखेरीस विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या नाही आणि परीक्षा १ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबरच्या दरम्यान घेण्यात आली.
पीएचडी पूर्व परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी आजतागायत उमविच्या वेबसाईटवर नाही. बरेच निवेदन दिल्यावर विद्यापीठाकडून ८ फेब्रुवारी रोजी प्रोव्हीजनल गाईड लिस्ट जाहीर करण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट २०२० ला अंतिम गाईड लिस्ट विद्यापीठाने जाहीर केली. गाईड तसेच विद्यार्थ्यांना विलिंगनेस लेटर १८ ऑगस्ट २०२० पासून अपलोड करायचे होती. परंतु मार्गदर्शकांना लॉगीन आयडी विद्यापीठाकडून वेळेवर प्राप्त झाले नाही. एकंदरीत संशोधकांचा संशोधनाचा विषय आणि पीएचडी कोर्सवर २०२२ मध्ये होईल का? असा प्रश्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना पडला आहे. तरी आपण कोरोनाची स्थिती विचारात घेता विद्यार्थ्यांच्या संशोधनाच्या विषयात त्वरित मान्यता द्यावी. जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचे संशोधन सुरू करता येईल. तसेच कोर्सवर्क व त्याची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी व पीएचडीच्या प्रक्रियेला गती द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. दरम्यान या निवेदनावर मनोज चौधरी, नीलेश पाटील, सुरेंद्र कोल्हे, किरण अहिरे, इमाम पिंजारी आदींच्या स्वाक्षर्या आहेत.