धरणगाव (प्रतिनिधी) शहरात आणि ग्रामीण भागात तंबाखू व रसायन मिश्रीत घातक गुटखा विक्रीला शासनाने बंदी आणली आहे. परंतू येथील काही माफियांनी खुलेआम गुटखा विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. एवढेच नव्हे तर, काही दिवसापूर्वी एक भला मोठा गुटख्याने भरलेला ट्रक शहरात उतरविण्यात आल्याचे कळते. त्यामुळे धरणगावात गुटखा विक्रीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे का?, असा प्रश्न आता सुज्ञ नागरिक विचारू लागले आहेत. दरम्यान, नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांचे गुटखा मुक्त रेंज अभियानाला धरणगावात ब्रेक लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
गुटखा विक्रीतुन झटपट श्रीमंत होण्यासाठी चांगली संधी असल्याने शहरातील अनेक तस्कर या व्यवसायात पाय रोवण्यासाठी सरसावले आहेत. व्यवसाय करण्यासाठी राजकीय वजन आणि ओळखीचा फायदा घेऊन मध्यस्थाकरवी जोरदार फिल्डींग लावली जाते आहे. अनेकजण धंद्याचा मुखीया मीच असावा म्हणून आता चढाओढ करू लागले आहे. यातूनच एकमेकांच्या छूप्या धंद्याच्या तक्रारी वाढत आहेत. राज्यात शासनाने गुटखा बंदी लागू केली. त्यानंतर अन्न व सुरक्षा मानके कायदा २००६ विनियमन २०११ नुसार गुटखा विक्री करणे किंवा त्याचे वितरण करणे गुन्हा ठरतो. यावर नियंत्रण ठेवण्याकरिता अन्न व औषधी प्रशासन हा स्वतंत्र विभाग आहे. परंतू तरी देखील गुटखा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर त्यांचा धाक उरलेला नसल्याने या कायद्याची पायमल्ली होत आहे. फक्त शासनाने दिलेल्या उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता अधिकारी काही ठिकाणी कारवाया करीत असल्याचे वास्तव आहे. तंबाखूजन्य पुड्यांची खुलेआम होत असलेली विक्री युवकांना कर्करोगाच्या हवाली करत आहे तर काही ठिकाणी अल्पवयीन मुलांनाही याची सर्रास विक्री केली जात आहे. गावात गल्लो-गल्ली बिनधास्त गुटखा विकला जातोय. त्यामुळे धरणगावात गुटखा विक्रीला प्रशासकीय मान्यता? मिळाली आहे का?, असा प्रश्न आता सुज्ञ नागरिक विचारू लागले आहेत. प्रशासनाचा वरदहस्त असल्याशिवाय इतक्या उघडपणे गुटखा कसा विकला जावू शकतो?, असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. तसेच नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी नुकताच गुटखा मुक्त रेंज अभियानाचा मानस व्यक्त केला होता. परंतू श्री. दिघावकर यांच्या मानसाला धरणगावात ब्रेक लागला लागल्याचे चित्र आहे.