मुंबई (वृत्तसंस्था) पुतळ्यासाठी वापरला जाणाऱ्या पैशातून जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये कोविड सेंटर उभे करावे. आज त्याची अधिक गरज आहे. हा पैसा त्यासाठी वापरला तर अजून अनेकांचे जीव वाचवण्यास आपल्याला मदत होईल. मी यापूर्वीपासून सांगतोय की पुतळ्याला माझा विरोध असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
झी चोवीस तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत आंबेडकर बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते इंदू मिलवरील जागेवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सर्वांच्या सहभागाने पायाभरणी होणार असल्याचे सांगितले आहे. यासंबंधी त्यांनी निर्देशही दिले. परंतु वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपला या पुतळ्याला विरोध असून ते पैसे कोविडसाठी खर्च करावे, अशी भूमिका घेतली आहे. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, आज कोविड सेंटरची अधिक गरज आहे. हा पैसा त्यासाठी वापरला तर अजून अनेकांचे जीव वाचवण्यास आपल्याला मदत होईल. कोरोनातून लोकांना वाचवणे ही सर्वात मोठी गरज आहे. त्यामुळे पुतळ्यावर खर्च करण्याऐवजी तो निधी करोनासाठी खर्च करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: म्हणत होते. आपल्याला पुतळ्यांची गरज नाही माणसाची गरज आहे. आपल्याला विचारसरणीची गरज आहे. या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत ही मानत असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. पुतळ्याच्या उद्घाटनाचं निमंत्रण जरी आलं तरी आपण त्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पुतळ्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे संगीतले.