मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतून बॉलीवूड हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कोणी कितीही आपटली तरी मुंबईतील बॉलीवूडच्या केसालाही धक्का लागणार नाही, असा इशारा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.
बॉलिवूडला हादरे देऊन हा संपूर्ण उद्योग उद्ध्वस्त करण्याचा ‘डाव’ गंभीर आहे. मुळात कोणी कितीही आपटली तरी मुंबईतील बॉलिवूडच्या केसाला धक्का लागणार नाही. आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतून हलवण्याइतके ते सोपे नाही. मुख्यमंत्र्यांनी या क्षेत्रातील प्रमुख लोकांशी चर्चा केली आणि त्यांना दिलासा दिला, हे योग्यच झाले. दादासाहेब फाळके या मराठी माणसाने भारतीय सिनेसृष्टीचा पाया मुंबई-महाराष्ट्रात घातला. हा पाया कच्च्या पायावर उभा नाही. लवकरच ‘पडदे’ जिवंत होतील, बॉलिवूडला जाग येईल. मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवायला हवा, असे सामना संपादकीयात म्हटले आहे.
बॉलिवूडला संपविण्याचा डाव खपवून घेणार नाही, असा दम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. त्यामुळे ज्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचायला हवा तेथे तो नक्कीच पोहोचला आहे. हिंदी सिनेसृष्टी म्हणजे बॉलिवूडची पाळेमुळे मुंबईत पसरलेली आहेत. गेल्या शंभर वर्षांपासून ही पाळेमुळे मजबुतीने टिकून आहेत. अनेकांचे कष्ट आणि घाम त्या कारणी लागले आहेत; पण सुशांत मृत्यू प्रकरणानंतर काही पोटदुख्यांनी बॉलिवूडविरोधात जी मोहीम सुरू केली आहे ती धक्कादायक आहे. मुख्यमंत्र्यांनी काल सांगितले की, बॉलिवूडला गेल्या काही दिवसांपासून ठराविक वर्गाकडून बदनाम करण्यात येत आहे. ही बाब अत्यंत वेदनादायक आहे.
‘बॉलिवूडवर नशेबाजीचा आरोप करायचा, रोज तोच खोटारडेपणा मोठ्याने बोलून समोर आणायचा, पण पुराव्यांच्या नावाने ठणाणा. पण आता काय घडले?’ असा खोचक प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे. ‘विवेक ऑबेरॉयच्या घरावर बंगळुरुच्या पोलिसांनी छापा टाकला. विवेकच्या बायकोचा भाऊ हा बंगळुरु ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आहे. विवेक महाशय हे भाजप गोटातले म्हणून ओळखले जातात व पडद्यावर नरेंद्र मोदी यांची भूमिका विवेक ऑबेरॉयने साकारली होती. या सर्व ड्रग्ज प्रकरणाशी विवेक ऑबेरायचा संबंध असेल किंवा आहे, असं आम्ही म्हणणार नाही, पण कुठले धागे कुठे पोहोचतील याचा सध्या भरवसा नाही, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.