जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात आज दिवसभरात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल १२ आरोपींना अटक केली आहे. यातील तीन आरोपींना पुणे न्यायालयात हजर केल्यानंतर पोलीस कोठडी मिळण्यासाठी पोलिसांनी तब्बल १५ महत्वपूर्ण कारणे दिली आहेत. जाणून घ्या ही कारणे !
अटक आरोपींना पोलीस कोठडी मिळण्याची कारणे !
१) सदर आरोपी यांनी बीएचआर पतसंस्थेतून कर्जाच्या नावाखाली घेतलेली रक्कम परतफेड न करता वेगवेगळ्या ठेवीदारांच्या ठेवी कमी किमतीत ठेवून स्वतः चे पूर्ण पैसे परतफेड करण्यासाठी वापर केला आहे. सदर कटामध्ये आरोपी सोबत कोणकोण सामील आहे, याचा तपास करणे आहे.
२) सदर आरोपी यांनी ठेवपावत्या ठेवीदारांकडून गोळा करण्यासाठी नेमलेले एजंट कोण कोण आहे व त्यांचा नमूद गुन्ह्यात सहभाग काय आहे याबाबत तपास करणे आहे.
३) सदर आरोपी यांचा या गुन्ह्यातील इतर आरोपी नामे सुनील देवकीनंदन झंवर, सुरज सुनील झंवर, महावीर जैन, जितेंद्र कंडारे, सुजित वाणी, विवेक ठाकरे इत्यादी यांचेशी संगनमत करून गुन्ह्यात प्रत्येक आरोपीची भूमिका कशी होती?, याबाबत तपास करणे आहे. तसेच नमूद आरोपी यांचे कर्ज खाते निरंक करण्यामागे संबंधितांचा काय सहभाग आहे याचा तपास करणे आहे.
४) नमूद गुन्ह्यातील आरोपी नामे सुनील झंवर व सुरज झंवर याच्या कार्यलयात मिळालेल्या संगणकावरील डाटामध्ये ठेवीदार व कर्जदार यांच्या याद्या मिळुन आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याशी काय संबंध आहे हे तपासात निष्पन्न करणे आहे.
५) नमुद गुन्ह्यातील यापूर्वी अटक केलेले पाहिजे आरोपीचे ऑफिसमधून मोठ्या प्रमाणावर दस्तावेज जमा करण्यात आला असुन त्यामध्ये काही दस्तावेज अटक आरोपी यांच्याशी संबंधित आहे. नमूद दस्तावेज बाबत आरोपीकडे तपास करणे आहे.
६) सदर आरोपी इतर आरोपी यांच्यातील गुप्त कटात अजुन कोण कोणत्या व्यक्ती होत्या या बाबत आरोपीकडे तपास करणे आहे.
७) यापुर्वी अटक व पहिले आरोपी हे बीएचआरच्या मुख्य ऑफिसमध्ये येत होते. त्यांचेत झालेल्या मिटिंगमध्ये विविध कर्जप्रकरणांची तडजोड करण्यात आली असल्याचे निष्पन्न झाले असुन सदर बाबत अटक आरोपीकडे तपास करणे आहे.
८) सदरचे प्रकरण अत्यंत गंभीर असुन मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार गैरव्यवहार संगनमताने व पूर्वनियोजित कटाने झालेला असुन आरोपींचे गैरवर्तन पाहता व संस्थेत केलेल्या बेकायदेशीर नोंदी व इतर गैरव्यवहार बाबत आरोपींचा व इतर आरोपीं बरोबर काय संबंध आहे याबाबत तपास करणे आहे.
९) नमुद गुन्ह्यामध्ये कर्ज निरीक्षकांच्या खोट्या नोंदी जितेंद्र कंडारे, सुजीत वाणी यांनी केल्या आहेत याबत सदर आरोपींचे गुन्ह्यातील आरोपी यांच्याशी काय संबंध आहे याबाबत तपास करणे आहे.
१०) सदर अटक आरोपींच्या बँक खात्याची व गुंतवणुकीची माहिती प्राप्त करणे आहे.
११) सदर अटक आरोपी यांनी प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यासाठी स्टॅम्प पेपर वर कोठून खरेदी केली व त्यांच्या मिटिंग कोठे होत होत्या या बाबत तपास करणे आहे.
१२) अटक आरोपींनी काही ठेवीदारांना रोख रक्कम दिलेली आहे. सदरचे रोख रक्कम त्यांनी कोठून आणली याबाबत तपास करणे आहे.
१३) सदर अटक आरोपी यांच्या बीएचआर व्यतिरिक्त कोठे बैठका होत होत्या याबाबत तपास करणे आहे.
१४) गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खोटा दस्तऐवजी पुरावा असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरचा दस्तऐवजी पुरावा कोठे बनविण्यात आला याबाबत तपास करणे आहे. तसेच नमूद अटक आरोपींचे हस्ताक्षर नमुने घेऊन ते हस्ताक्षर तज्ञांकडे पाठवून अभिप्राय प्राप्त करणे आहे.
१५) आरोपी हे जळगाव, मुंबई व औरंगाबाद येथील रहिवासी असुन त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ठेवदारांच्या ठेवी वर्ग करून घेतल्या आहेत त्यामुळे पुरावे गोळा करण्यासाठी विविध जिल्ह्यात तपासकामी जावे लागणार आहे.