मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत बुधवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर मुसळधार पावसामुळे मालाड पश्चिमेकडील मालवणी भागातील इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. मालाडच्या मालवणी भागात ही घटना घडली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून १७ जण गंभीर जखमी झालेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागातील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये ६ लहान मुलांचा समावेश आहे. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहे. सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तर दुसरीकडे जखमींना मदतही केली जात आहे. त्यातच मुंबईतील मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात मोठी दुर्घटना घडली. या ठिकाणी एका ३ मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या १ मजली चाळीवर कोसळला. त्यामुळे ११ जणांना जीव गमवावा लागला. सुरुवातीला एक दुमजली घर कोसळ्याची माहिती समोर आली होती. मात्र त्यानंतर काही सेकेंदाने पुन्हा काहीतरी कोसळल्याचा आवाज आला. यानंतर स्थानिकांना चार मजली इमारत कोसळल्याचे लक्षात आले.
मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारपासूनच मुंबईसह राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. मंगळवारी ८ जून सकाळपासून सुरु असलेल्या पावसाने बुधवारी ९ जून रौद्ररुप धारण केलं. त्यामुळे पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले होते. पण रात्री दहा नंतर पावसाने थोडी उसंत घेतली.